Shirur Crime: शिरूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच महिन्यात ७ दुचाकी चोरीला; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?
Shirur Crime: पेट्रोल पंप, सोसायटी पार्किंग आणि दुकानांसमोरून गाड्या गायब; चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचा नागरिकांचा आरोप.

Shirur Crime – शिरूर तालुक्यात गेल्या महिनाभराच्या काळात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, चोरट्यांनी अक्षरशः पोलिसांनाच खुले आव्हान दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. केवळ एका महिन्यात शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या चोऱ्यांपैकी बहुतांश घटनांमध्ये अद्याप आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नसल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, दुचाकी चोरीच्या मालिकेसोबतच सोनसाखळी चोरी, घरफोड्या, दरोडे, खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे प्रकारही वारंवार घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी चोरट्यांनी भरदिवसा आणि रात्रीच्या वेळी दुचाकी लंपास केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांनुसार (दि.१४) जून ते (दि.२४) जुलै या कालावधीत काठापूर, बाबुरावनगर, बोऱ्हाडेमळा, आलेगाव पागा, स्टेट बँक कॉलनी, ओम साई मेडिकल परिसर आणि न्हावरे येथून विविध कंपन्यांच्या दुचाकी चोरीस गेल्या आहेत. सर्व गुन्ह्यांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. चोरटे आता भरदिवसाही सक्रिय असल्याचे अनेक घटनांतून स्पष्ट झाले आहे.
काही ठिकाणी पेट्रोल पंप, वैद्यकीय दुकान, सोसायटी पार्किंग, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी सहजपणे लंपास केल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “चोरट्यांना पोलिसांचा धाक उरलेला दिसत नाही. दिवसाढवळ्या दुचाकी चोरी होत आहेत. अनेक सीसीटीव्ही असतानाही आरोपी सापडत नाहीत.
त्यामुळे सामान्य नागरिकांनी नेमका कोणावर विश्वास ठेवायचा?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. व्यापारी, शेतकरी, नोकरदार आणि विद्यार्थी यांची वाहतुकीची प्रमुख साधने असलेल्या दुचाकी चोरीस गेल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. विमा प्रक्रिया, पोलीस तपास आणि नवीन वाहन खरेदीचा वाढलेला खर्च यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी शिरूर शहर आणि ग्रामीण भागात रात्रीची गस्त वाढविणे,
संशयितांवर विशेष लक्ष ठेवणे, सीसीटीव्ही नेटवर्क अधिक प्रभावी करणे, वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करणे आणि प्रलंबित गुन्ह्यांचा वेगाने छडा लावण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व चोरीच्या घटनांचा तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.






