औरंगाबाद – ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुहास जेवळीकर यांचे काल मध्यरात्री दिर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भूलतज्ज्ञ विभागाचे विभागप्रमुखचाही कार्यभार त्यांनी सांभाळला होता.
डॉ. जेवळीकर यांचे एमबीबीएस, एमडीचे शिक्षण औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले. या महाविद्यालयातून भूलतज्ज्ञ विभागाचे विभाग प्रमुख म्हणून काही वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले. घाटी रूग्णालयाचे अधीक्षक म्हणूनही त्यांनी प्रभावीपणे काम केले. याच रूग्णालयात काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर काल रात्री त्यांनी उशीरा रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
डॉ. जेवळीकर हे मराठीतील प्रख्यात लेखक होते. त्यांची ऐरणीच्या देवा, सभोवार, स्वास्थसंवाद, तिरीप, दहशतीची दैनंदिनी (कवितासंग्रह) ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना राज्य शासनाचा वाडमयीन पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीच्या वतीने दिला जाणारा इंदिरा संत पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.