Satara Zilla Parishad – जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन तब्बल बारा दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सत्ता समीकरणांवर निर्णय झालेला नाही. भाजपने जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा विषय आता प्रतिष्ठेचा केला आहे. भाजपचे ऑपरेशन लोटस ओळखून राष्ट्रवादी काँग्रेसने आपले सदस्य कर्नाटकात हलवले असून शिवसेनेचे सदस्य सुद्धा आता पक्षाच्या नजर कक्षेत आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या खांद्यावर भाजपने आता सत्ता स्थापनेची जबाबदारी दिली असून बहुमताचा 33 आकडा जुळवण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी वरिष्ठ पातळीवरून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. कोपर्डे हवेली गटातून निवडून आलेल्या रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नी विद्या वेताळ तसेच काही अपक्ष यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. अशा परिस्थितीत शिंदे शिवसेना गटाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी दरे गावात दाखल झाले. त्यामुळे पुढील 24 तासांमध्ये सत्ता स्थापनेच्यासंदर्भाने जोरदार चर्चा होणार असल्याची चिन्हे आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची महाबळेश्वरमध्ये एकत्र भेट होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सातारा जिल्हा परिषद भाजपने एकत्रिकरणाच्या संदर्भाने चर्चा सुरू केली तरी ती वरिष्ठ पातळीवरून म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात चेंडू ढकलण्याचा प्रकार आहे. भाजपचा हा प्रस्ताव शिंदे स्वीकारणार का हा खरा प्रश्न आहे. रायगड जिल्ह्यामध्ये भाजपने शिंदे गटाला बाजूला ठेवत सत्ता स्थापनेचा प्रयत्न केल्याने पश्चिम महाराष्ट्रातील एकत्र येण्याच्या राजकीय शक्यता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. सातारा जिल्ह्यात भाजपला बाजूला ठेवून राष्ट्रवादी काग्रेस अजित पवार गट व शिंदे गट एकत्र येण्याच्या मनस्थितीत आहेत आणि तसा राजकीय मनसुबा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलूनही दाखवला आहे. सत्ता स्थापनेचे त्रांगडे अजून कायम असल्याने अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रमही ग्रामविकास मंत्रालयाकडून वारंवार लांबणीवर टाकला जात आहे. ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपचा अध्यक्ष बनवण्यासाठी राजकीय चमत्कार करू असा दावा केला होता. तो दावा कोणत्या राजकीय गणितांच्या आधारावर केला याविषयी सुद्धा जबरदस्त उत्सुकता आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या संदर्भाने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांना याबाबतची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी ‘आम्ही मिठी सुद्धा मारायला तयार होतो,’ असे वक्तव्य केले होते. शिवजयंती दिवशी सुद्धा पालकमंत्री देसाई यांच्याबरोबर एकत्र फ्लॅग ऑफ केला होता. सत्ता स्थापनेमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र राहणार का याबाबतही तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. या सर्व घडामोडींवर एकनाथ शिंदे यांच्या शनिवारच्या आणि रविवारच्या साताऱ्यातील राजकीय दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे .