Satara Crime: लक्ष्मी टेकडीवरील ‘त्या’ त्रासाला नागरिक वैतागले! मध्यरात्रीच पोलीस ठाण्यात; नक्की काय घडलं?
Satara Crime: मध्यरात्री ११ वाजता पोलीस ठाण्यावर धडकला मोर्चा; लक्ष्मी टेकडी भागात तातडीने 'कोंबिंग ऑपरेशन' राबवण्याची नागरिकांची मागणी.

Satara Crime – येथील सदरबाजार परिसरातील लक्ष्मी टेकडी भागात बेकायदा दारु विक्री, मटका आणि अन्य अवैध धंद्यांबरोबरच भांडणे, मारामाऱ्या, कौटुंबीक वाद आणि उपद्रवी प्रवृत्तींचा वाढता त्रास नागरिकांच्या सहनशीलतेपलीकडे गेल्याचे चित्र आहे. या प्रकारांना वैतागलेल्या नागरिकांनी बुधवारी रात्री थेट रस्त्यावर उतरून तब्बल अडीच किलोमीटर पायी मोर्चा काढत सातारा शहर पोलीस ठाण्यावर धडक दिली.
लक्ष्मी टेकडी येथून रात्री सुमारे अकराच्या सुमारास निघालेला हा मोर्चा सातारा शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. परिसरातील सामाजिक वातावरण दिवसेंदिवस बिघडत असून महिला आणि कुटुंबीयांना असुरक्षिततेचा सामना करावा लागत असल्याच्या व्यथा नागरिकांनी पोलिसांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. बेरोजगारी, मोबाइल रील्सचा वाढता प्रभाव, कौटुंबीक कलह आणि अवैध धंद्यांचे जाळे यामुळे तरुणाईवरही विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
लक्ष्मी टेकडी परिसर यापूर्वीही हाणामाऱ्या आणि गुन्हेगारी घटनांमुळे संवेदनशील राहिला आहे. त्यामुळे अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी केवळ कारवाईच्या घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष आणि सातत्यपूर्ण पोलिसी कारवाईची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे गंभीर गुन्ह्याच्या तपासात व्यस्त असल्याने मोर्चेकऱ्यांची त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. आता या गंभीर तक्रारींवर पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
शांततापूर्ण जगण्याची नागरिकांची मागणी
“लक्ष्मी टेकडी परिसरातील उपद्रवी प्रवृत्तींवर तातडीने कोंबिंग ऑपरेशन राबवून संशयितांची तपासणी व कायदेशीर कारवाई करावी. अवैध धंद्यांना आळा घालून परिसरात कायदा-सुव्यवस्था निर्माण करावी. नागरिकांना भीतीच्या वातावरणातून मुक्त करून शांततेत जगण्याची संधी द्यावी,” अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.





