Satara Potholes: हाडे खिळखिळी करणारा प्रवास! अंधार व उघड्या गटारांमुळे अपघातांचा धोका; पालिकेचा निष्काळजीपणा उघड!
Satara Potholes: राधिका रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे अन् उंचवटे; ८ ते १० फूट खोल उघड्या गटारांमुळे अपघातांचा धोका वाढला.

Satara Potholes – शहरातील महत्त्वाच्या राधिका रस्त्याची (ममाजी राज्यपाल गणपतताव तपासे पथ) अक्षरशः चाळण झाली असून बारटक्के कॉर्नर, महाराणा प्रताप चौक, ॲक्सिस बँक आणि गंमत जंमत वाईन शॉप या प्रमुख टप्प्यांदरम्यान वाहनचालकांना जीव मुठीत धरुन धक्के खात प्रवास करावा लागत आहे. खड्डे आणि उंचवट्यांच्या विचित्र मिश्रणामुळे हा रस्ता वाहनचालकांसाठी अक्षरशः ‘हाडे खिळखिळी’ करणारा ठरत आहे.
प्रतापसिंह शेती फार्मसमोर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. बारटक्के कॉर्नर परिसरात रस्त्यावर अवजड वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला गुळगुळीत भाग अरुंद होतो. परिणामी वाहनचालकांना नाईलाजाने खड्ड्यांतून मार्ग काढावा लागत आहे. प्रतापसिंह शेतीफार्मसमोरुन सोसायटीकडे जाणाऱ्या मार्गावर पथदिव्यांचा अभाव आहे.
अंधारामुळे आठवडाभरापूर्वी दोन महिलांचा अपघात झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. राधिका रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोठ्या उघडी गटारेही धोकादायक ठरत आहेत. या गटाराची कामे सुमोरे दोन वर्षांपूर्वी झाल्यावर या गटारांवर झाकणे टाकण्याचे काम ठेकेदार आणि अधिकारी दोघेही विसरुन गेले आहेत.
मुख्य गटारे आठ ते दहा फूट खोल आहेत. अपघाताची भीती असल्याच्या तक्रारी करुनही पालिकेने गटारांवर झाकणे बसविणे टाळले आहे. पोलीस वसाहतीच्या इमारती वगळता बहुतांश ठिकाणी गटारे उघडी असल्याने रात्रीच्या वेळी गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
खड्डे बुजविण्यासाठी पावसाचीच वाट का?
रस्ते दुरुस्तीसाठी ६० लाखांचे साहित्य तयार असल्याचे सांगितले जाते. मग नागरिकांनी खड्ड्यांतूनच का प्रवास करायचा? असा संतप्त सवाल नागरिकांमधून केला जात आहे. पाऊस थांबण्याची वाट पाहत असताना एखादा गंभीर अपघात झाला, तर त्याची जबाबदारी कोणाची? असा जाब बांधकाम विभागाला जाऊन विचारायची मानसिकता या प्रभागातील नागरिकांची झाली आहे .
खड्डे की डागडुजीचा दिखावा?
शुक्रवार पेठेत खड्ड्यांत मातीचा चुरा आणि दगड भरून दुरुस्ती केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. ही डागडुजी किती दिवस टिकणार? सार्वजनिक निधीचा असा अपव्यय कोणाच्या देखरेखीखाली सुरू आहे? असे लोक विचारत आहेत.
उघड्या गटारांना वाली कोण?
राधिका रस्त्यालगतची उघडी गटारे अपघाताला आमंत्रण देत आहेत. पथदिवे बंद आणि गटारे उघडी असताना पालिका प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार? या प्रश्नांची उकल होत नसल्याने सार्वत्रिक संतापाचे वातावरण आहे .
नागरिकांना ‘स्मार्ट’ रस्ता कधी?
शहराच्या विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष रस्त्यांची अवस्था यामध्ये जमीन- अस्मानाचा फरक आहे. कर भरणाऱ्या नागरिकांना खड्डेमय रस्ते देणे, ही पालिकेची जबाबदारी टाळण्याची भूमिका नाही का? प्रशासनाने तारीख जाहीर करून राधिका रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.





