सांगली : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याचे मुख्यालय असलेल्या इस्लामपूर शहराचे नाव आजपासून अधिकृतरीत्या ‘ईश्वरपूर‘ असे करण्यात आले आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधीची अधिसूचना (Notification) जारी केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या ऐतिहासिक निर्णयाची माहिती दिली. केंद्र-राज्याची मोहोर – बावनकुळे यांनी सांगितले की, इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सादर करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. केंद्र व राज्य शासनाने अधिसूचना जारी केल्यामुळे आता इस्लामपूर शहर व नगर परिषदेचे नाव ‘ईश्वरपूर’ असे झाले आहे. या निर्णयाबद्दल बावनकुळे यांनी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. पाच दशकांची मागणी पूर्ण – इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करावे, अशी मागणी गेल्या सुमारे ५० वर्षांपासून प्रलंबित होती. १९७० च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी ही मागणी सर्वप्रथम केली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८६ मध्ये जाहीर सभेत ‘हे ईश्वरपूर आहे’ असे वक्तव्य केले होते. अलिकडे भाजपा नेते अण्णा डांगे, आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे यांनीही ही मागणी लावून धरली होती. गाव किंवा शहराचे नाव बदलण्याचा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असल्याने, सर्व मार्गदर्शक तत्त्वे पूर्ण करून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला गेला होता. केंद्र सरकारच्या मान्यतेमुळे येथील जनतेची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. आजपासून सर्व शासकीय दस्तऐवज आणि व्यवहारांमध्ये या शहराचा उल्लेख ‘ईश्वरपूर’ असा होणार आहे.