आपल्याकडे साजऱ्या होणाऱ्या सर्व सणांमध्ये, उत्सवांमध्ये दिवाळीचं महत्त्व हे खूप वेगळं आहे. हा प्रकाशाचा, तेजाचा, आनंदाचा सण आहे. दिवाळीतील प्रत्येक दिवसांशी जोडलेल्या पुराणकथा आहेत, त्याचप्रमाणे परंपराही जोडलेल्या आहेत. आमचं बालपण पुण्यात गेले असल्यामुळे लहानपणापासून घरी आम्ही या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. आज इतक्या वर्षांनंतरसुद्धा दरवर्षी घरामध्ये या सर्व परंपरा काटेकोरपणे पाळल्या जातात. माझ्या मते, केवळ कपडे चांगले घालणे आणि मोठी खरेदी करणे एवढेच दिवाळीचे महत्त्व नसून या सगळ्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. परंपरांच्या माध्यमातून अतिशय उत्साहाने, स्नेहाने हा सण साजरा करतो.
दीपावली हा भारतीय संस्कृतीच्या प्रकाशाचा मंगलसोहळा आहे. भारतीय संस्कृती हे नेहमीच दीपपूजा करणारी आहे. दिवा हा भारतीय संस्कृतीचा प्राण आहे. तो नुसता प्रकाश देत नाही तर तो आंतरिक मनांना उजाळा देतो. मनामनांना स्वच्छ करतो. मनामनांना जुळवतो. त्यामुळे भारतातील सर्वच प्रांतात दीपावलीचा उत्सव आनंदाने साजरा करतात. अर्थात, सध्याच्या काळात भारतात प्रत्येक सण हा इव्हेंटसारखा साजरा होऊ लागलेला आहे. यामध्ये पारंपरिक किंवा पुराणांमधून आलेल्या प्रथांचा, परंपरांचा भाग हळूहळू कमी होताना दिसत आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने आपल्याकडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या अशा बऱ्याच पारंपरिक गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. त्या अलीकडे फारशा कुणी पाळताना दिसत नाही. मग त्यामध्ये नरकचतुर्दशीच्या दिवशी पायाने कारट मोडणे असो किंवा भल्या पहाटे शौचालयामध्ये पणती लावणे असो; अशा सर्व गोष्टी येत्या काळात कालबाह्य ठरतील की काय असे वाटू लागले आहे; परंतु आमच्या घरी मात्र आम्ही अशा प्रत्येक परंपरांचे, प्रथांचे पालन अगदी काटेकोरपणे करतो.
आमचं बालपण पुण्यात गेले असल्यामुळे लहानपणापासून घरी आम्ही या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे आता इतक्या वर्षांनंतरसुद्धा दरवर्षी घरामध्ये या सर्व परंपरा काटेकोरपणे पाळल्या जातात. माझ्या मते, केवळ कपडे चांगले घालणे आणि मोठी खरेदी करणे एवढेच दिवाळीचे महत्त्व नसून या सगळ्या परंपरेने चालत आलेल्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. अलीकडच्या काळात घरात करावयाच्या फराळाचे वगैरेही फारसे महत्त्व राहिलेले दिसून येत नाही. कारण हे पदार्थ वर्षभर मिळतात. त्यामुळे दिवाळीसाठी म्हणून त्याचे अप्रूप राहिलेले दिसत नाही. तसेच अलीकडे हवामानातसुद्धा खूप मोठा बदल झालेला आहे. लहानपणी दिवाळीसाठी पहाटे उठून फटाके उडवायचे म्हणजे बाहेर चांगलीच थंडी असायची.
या थंडीमध्ये सुगंधी तेलाने आणि उटण्याने अभ्यंग करून नवे कपडे घालून फटाके उडवण्यात वेगळीच मजा असायची; परंतु आता मात्र दिवाळीच्या दिवसात उकाडा तरी जाणवतो किंवा पाऊस तरी हजेरी लावतो. थोडक्यात, सगळ्याच प्रकारचे वारे थोडेसे विरुद्ध दिशेने वाहू लागल्याचे दिसून येत आहे. मुंबईसारख्या शहरात कचऱ्याची समस्या पाहता पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानुसार स्वतःहून बाहेर पडून हे रस्ते स्वच्छ करण्यासाठी इतरांनाही सोबत घ्यावे आणि ती मोहीम पुढे राबवावी, असे वाटते. या दिवाळीनिमित्त निदान आपल्या घरातील कचरा तरी बाहेर कुठेही उघड्यावर टाकू नये एवढे पथ्य तरी लोकांनी पाळायला हवे, असे वाटते. कचऱ्याची विल्हेवाट चांगल्या पद्धतीने लावेन असे चांगले संकल्प प्रत्येकानेच दिवाळीच्या निमित्ताने करायला हवेत.
याशिवाय फटाक्यांच्या आवाजांवरदेखील नियंत्रण कसे राहील हे पाहिले पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून आवाज काही प्रमाणात कमी झालेला दिसत आहे; परंतु धूर मात्र खूप वाढलेला आहे आणि या सगळ्यामधून प्रदूषण वाढतच चालले आहे. तेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा विचार अवश्य केला पाहिजे आणि त्यानुसार दिवाळी साजरी केली पाहिजे. मला स्वतः फटाके उडवायला अतिशय आवडतात; पण अलीकडे प्रदूषणाचे वाढते प्रमाण पाहून मी ते बंद केलेले आहे. फक्त परंपरा आहे म्हणून फुलबाजीचा एक बॉक्स आणते. यातील फुलबाजी सकाळी अभ्यंग स्नानाच्या वेळी आणि संध्याकाळी उडवते.
आमच्या घरात पहाटे अंघोळ करताना दिवा लावायचा, तो उतरवायचा, अगदी पारंपरिक पद्धतीने अंगाला उटणे वगैरे लावून आंघोळीला बसल्यानंतर न्हाणीघरात पणती लावायची आणि त्यावेळी फुलबाजी लावायची अशी पद्धत पाळली जाते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या स्नानाच्या वेळी आम्ही ही परंपरा आजही पाळतो.
तसेच पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजनदेखील करतो. दिवाळीच्या निमित्ताने नरकचतुर्दशीच्या दिवशी आम्ही सर्व आप्तेष्ट एकत्र जमतो आणि सगळे मिळून फराळाचा आनंद घेतो. फराळासोबतच एक गरम पदार्थदेखील असतो. यामध्ये प्रामुख्याने भजी केली जातात. बहुधा माझ्याच घरी सगळे जण जमतात. कारण माझ्या नवऱ्याला अशा सर्व गोष्टींची खूप आवड आहे.
दिवाळीच्या निमित्ताने मी सगळ्यांसाठी भेट वस्तू आणते. 15 दिवस आधीपासून या भेटवस्तूंसाठीची तयारी सुरू होते. त्या व्यवस्थित पॅक करून प्रत्येकाला देण्यात मला खूप आनंद मिळतो. अर्थात, या वस्तू मी अतिशय विचार करून आणि उपयोगात कशा येतील, हे पाहूनच खरेदी करते. त्यामध्ये सरप्राईज द्यायला मला आवडते. कारण कोणाला काय गिफ्ट दिले आहे, हे बघण्यात प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो मला खूप आवडतो. काही वर्षांपूर्वी नरक चतुर्दशीच्या दिवशी माझ्या आईचे निधन झाले. ती होती तेव्हा तिच्या आवाजातील गाण्यानेच आमची पहाट व्हायची. तिची गाणी रेडिओवर वाजवली जायची. आजही आम्ही दरवर्षी आईची गाणी ऐकूनच ती पहाट साजरी करतो. आईला बेसनाचे लाडू खूप आवडायचे. म्हणून दरवर्षी तिच्या फोटोपुढे बेसनाचे लाडू करून आम्ही नैवेद्य दाखवतो. यामध्ये दुःखापेक्षाही तिच्या आठवणींना आम्ही यानिमित्ताने उजाळा देतो.
दिवाळीच्या निमित्ताने संपूर्ण घराची स्वच्छता होत असते. घरात फराळाचे पदार्थही बनतात. दिवाळीचे तिनही दिवस माझ्या घरात मदत करणाऱ्या माझ्या ज्या सख्या आहेत त्याही मोठ्या उत्साहाने घर सजवतात. दारापुढे प्रत्येक दिवशी वेगळी रांगोळी असते. दिवाळीसाठी जो आकाशकंदिल आम्ही घेतो तोही अगदी पारंपरिक पद्धतीचा झिरमिळ्यांचाच असतो. मला फॅन्सी अथवा वेगवेगळ्या आकारातील आकाशकंदिल आवडत नाही. याहीबाबतीत आम्ही परपंरा पाळतो. तसेच इलेक्ट्रॉनिक दिव्यांच्या माळांऐवजी मला भरपूर पणत्या लावून रोषणाई करायला आवडते. मी दरवर्षी संपूर्ण घरात पणत्या लावते. तसेच दरवर्षी एखाद्या अनाथाश्रमाला मी आठवणीने ठरावीक रकमेचा चेक देत असते. त्यांचीही दिवाळी आपल्याप्रमाणेच साजरी व्हावी, ही त्यामागची भावना असते. ही बाब जाहीर करण्यासारखी नाही; परंतु आपल्याकडे असलेल्यापैकी काही वाटा नसलेल्यांना द्यावा, ही आपली सांस्कृतिक शिकवण आहे. सणांच्या निमित्ताने ती जोपासली जावी असे मला वाटते. प्रत्येक जण आपापल्या परीने या दिशेने प्रयत्नशील झाल्यास मोठा बदल घडताना दिसू शकेल.
भाऊबीजेला आमच्याकडे सगळी सासरची माहेरची मंडळी जमतात. आमच्याकडे दीरांनादेखील यादिवशी ओवाळण्याची परंपरा आहे आणि त्यांच्या वहिनींनादेखील बहीण म्हणून ओवाळण्याची परंपरा आहे. त्यामुळे हादेखील सोहळा खूप आनंदात पार पडत असतो. या दिवशी आमची भली मोठी कमाई होत असते. त्यात बराच गमतीचाही भाग असतो. शिवाय, आम्ही सर्व बहिणीच असल्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी आम्ही एकमेकींना ओवाळून एकमेकींना साथ देण्याची, एकमेकींचे रक्षण करण्याची जणू ग्वाही देत असतो. पाडव्याच्या दिवशी मी नवऱ्याकडून दरवर्षी घसघशीत ओवाळणी घेते. त्याचा आनंद वेगळाच असतो. अशा प्रकारे आम्ही निरनिराळ्या परंपरांच्या माध्यमातून अतिशय उत्साहाने, स्नेहाने हा सण साजरा करतो.
– वंदना गुप्ते,
ज्येष्ठ अभिनेत्री