RSS chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यादरम्यान पठाणमथिट्टा जिल्ह्यातील पंपा नदीच्या काठावर वार्षिक चेरुकोलपुझा हिंदू अधिवेशनाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, हिंदू समाज जगाचा गुरू होईल यात शंका नाही. हिंदू समाजाला आपले जीवन जगण्यासाठी हिंदू एकात्मतेची गरज आहे आणि त्यातूनच शक्ती निर्माण होईल. जगात एक नियम आहे, जो समाज संघटित आहे तो सर्वोच्च स्थानी असतो, जो समाज संघटित नसून विभागलेला आहे, त्या समाजाची अधोगती होते. इतिहास आणि वर्तमान दोन्हीही याचे साक्षीदार आहेत. पारंपारिक कपडे घालण्याचा आणि इंग्रजी न बोलण्याचा सल्ला दिला – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख भागवत यांनी सांगितले की, हिंदूंनी पारंपारिक कपडे परिधान करावेत आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहताना इंग्रजी बोलू नये. “धर्म” हा हिंदू धर्माचा आत्मा आहे आणि प्रत्येकाने त्याचे वैयक्तिकरित्या पालन केले पाहिजे. प्रत्येक घरातील लोकांनी आठवड्यातून एकदा तरी प्रार्थना करण्यासाठी एका ठिकाणी जमले पाहिजे किंवा त्यांची जीवनशैली परंपरेनुसार आहे की नाही यावर चर्चा केली पाहिजे. भागवत म्हणाले, “आपण जी भाषा बोलतो, कोणत्याही ठिकाणी जातो तेव्हा आपले कपडे परंपरेनुसार आहेत की नाही, याचाही विचार केला पाहिजे. आपण आपल्या भागातील इतर ठिकाणी जाऊन आपल्या मदतीची गरज असलेल्या आपल्या बांधवांना भेटले पाहिजे. आपण इंग्रजी बोलू नये आणि आपले स्थानिक अन्नच खावे. कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना, आपण आपले पारंपारिक कपडे परिधान केले पाहिजेत,पाश्चात्य पोशाख परिधान करू नये.” ‘हिंदू समाजाने आपल्या अस्तित्वासाठी संघटित व्हावे’ – भागवत यांनी त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यात केरळचे आध्यात्मिक नेते आणि समाजसुधारक नारायण गुरू यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशनही केले. याआधी त्यांनी 16 ते 21 जानेवारी या कालावधीत आरएसएसशी संबंधित कार्यक्रमांसाठी या राज्याचा दौरा केला होता. भागवत म्हणाले की, हिंदू समाजाने आपल्या अस्तित्वासाठी संघटित होऊन एक समुदाय म्हणून स्वतःला बळकट केले पाहिजे. पण, बलवान असण्याचीही भीती असते. शक्तीचा वापर कोणत्या पद्धतीने केला जातो हे महत्त्वाचे आहे. यामुळे इतर कोणाचेही नुकसान होऊ नये. ते म्हणाले की जगभरातील संघर्षांना धर्म कारणीभूत आहे, कारण अनेकांना वाटते की त्यांचा धर्म आणि श्रद्धा सर्वोच्च आहे. हिंदू धर्म वेगळा आहे कारण तो सनातन धर्माचे पालन करतो आणि एकतेचे आवाहन करतो. ‘जात महत्त्वाची नाही’ – आरएसएस प्रमुख म्हणाले की, हिंदू धर्मात कोणीही लहान किंवा मोठा नसतो. जातीचा फरक नाही आणि अस्पृश्यतेला येथे जागा नाही. त्यांनी सर्व हिंदूंना एकमेकांचा आदर करण्याचे आवाहन केले आणि सर्व हिंदूंनी एकत्र आल्यास जगाला फायदा होईल, असे सांगितले. स्वतःला ओळखणे, सर्वांना समान वागणूक देणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे यासह एकत्र येण्याचे मार्गही भागवत यांनी सुचवले. ‘कुटुंबातील मूल्यांच्या महत्त्वावर चर्चा व्हायला हवी’ – पर्यावरणाच्या रक्षणासाठी धोरणात्मक बदलांना वेळ लागेल, पण लोक तीन छोट्या गोष्टी करू शकतात, असे ते म्हणाले. पाणी वाचवा, झाडे लावा आणि प्लास्टिकचा वापर थांबवा. RSS प्रमुखांनी कुटुंबातील मूल्यांच्या महत्त्वावर चर्चा करण्याचेही आवाहन केले. यामुळे केरळमधील अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या समस्येवर मात करण्यास मदत होऊ शकेल, असा दावा त्यांनी केला. ‘हिंदू हे एका स्वभावाचे नाव आहे’ – भागवत म्हणाले की, सामर्थ्यवान असणे हे उर्वरित जगासाठीही धोक्याचे ठरू शकते, कारण सत्ता ही शक्ती असते, तिला दिशा देणारी व्यक्ती त्या शक्तीचा वापर करते, हे त्याच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून असते, दुष्ट लोक ज्ञानाचा वापर वाद वाढवण्यासाठी करतात. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते की लोक पैशाचा वापर आपले मत वाढवण्यासाठी, शक्ती इतरांना त्रास देण्यासाठी वापरतात, परंतु संत लोकांच्या बाबतीत उलट आहे. चांगले लोक शिक्षणाचा उपयोग ज्ञान वाढवण्यासाठी करतात, संपत्तीचा उपयोग दानासाठी करतात, शक्तीचा उपयोग दुर्बलांचे रक्षण करण्यासाठी करतात. हिंदू ऐक्य जगासाठी फायदेशीर ठरेल, हे कसे होईल, याबाबत शंका घेण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. कारण, हिंदू हे एका स्वभावाचे नाव आहे, हिंदूमध्ये अनेक श्रद्धा, पंथ आहेत.