मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सूरज चव्हाण यांच्या हकालपट्टीनंतर अवघ्या काही दिवसांत प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्तीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण केल्याप्रकरणी सूरज चव्हाण यांना युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. मात्र, आता पक्षाने त्यांचे राजकीय पुनर्वसन करत थेट सरचिटणीसपदाची जबाबदारी दिल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘शब्दाला पक्का’ या प्रतिमेला धक्का बसल्याची टीका होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे, तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रोहित पवारांचा हल्लाबोल रोहित पवार यांनी सोशल मीडियावर तीव्र शब्दांत टीका करत म्हटले आहे, “लातूरमधील गुंडगिरी प्रकरणी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्य होता. पण महिन्याभरातच त्यांना प्रमोशन देणे याला काय म्हणायचे? अजितदादांच्या पक्षात दोन गट आहेत. एक गट जाणीवपूर्वक त्यांची प्रतिमा खराब करत आहे. ‘शब्दाला पक्का’ ही अजितदादांची ओळख धुळीस मिळवण्यासाठी ही नियुक्ती झाली आहे. मारहाणीत फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टर निघण्याआधीच प्रमोशन? याला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’च म्हणावं लागेल!” रोहित पवार यांनी अजित पवार गटातील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवत पक्षाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.Rohit Pawar : ‘शब्दाला पक्का’ अजित पवारांना धक्का; विनाशकाले विपरीत बुद्धी, सूरज चव्हाणांच्या प्रमोशनवर रोहित पवार आक्रमक Rohit Pawar : ‘शब्दाला पक्का’ अजित पवारांना धक्का; विनाशकाले विपरीत बुद्धी, सूरज चव्हाणांच्या प्रमोशनवर रोहित पवार आक्रमक काय आहे प्रकरण? पावसाळी अधिवेशनादरम्यान तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत मोबाईलवर रमी खेळल्याचा प्रकार समोर आला होता. यावरून छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमात आंदोलन केले आणि कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत पत्ते फेकले. यामुळे संतापलेल्या सूरज चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह विजय घाडगे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत घाडगे यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. या प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि अजित पवार यांनी त्यांची युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली होती. मात्र, आता अवघ्या काही दिवसांतच सूरज चव्हाण यांना पक्षाने प्रदेश सरचिटणीसपद देऊन पुन्हा मोठी जबाबदारी दिली आहे. अंजली दमानियांचा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, “युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हटवलेल्या सूरज चव्हाण यांना आता थेट सरचिटणीसपद? छावा संघटनेच्या नाकावर टिच्चून ही नियुक्ती झाली आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीला उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षात सरचिटणीस बनवले जाते? याला ‘Good Governance’ म्हणायचे का? विशेष म्हणजे, दोन आठवड्यांपूर्वी मानहानीच्या खटल्यात राष्ट्रवादीने कोर्टात सूरज चव्हाण हे आमचे पदाधिकारी नसल्याचे सांगितले होते. मग आता अचानक ही नियुक्ती कशी? पक्षाने काढलेली ‘जन सन्मान यात्रा’ हा सगळा दिखावा होता का?” अंजली दमानिया यांनी पक्षाच्या दुटप्पी धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.