Relationship Advice: नातं टिकवायचं असेल तर ‘आदर’ द्या; हुकूमशाहीमुळे ताण वाढतो, समुपदेशकांचा सल्ला
Relationship Advice नातं मजबूत ठेवायचं असेल तर प्रेमाइतकाच आदरही महत्त्वाचा असतो. समोरच्या व्यक्तीच्या विचारांना, भावना, इच्छा-अपेक्षा आणि मतांना किंमत दिली तर नात्यातील विश्वास वाढतो.

Relationship Advice: नातं मजबूत ठेवायचं असेल तर प्रेमाइतकाच आदरही महत्त्वाचा असतो. समोरच्या व्यक्तीच्या विचारांना, भावना, इच्छा-अपेक्षा आणि मतांना किंमत दिली तर नात्यातील विश्वास वाढतो. पण जर एकानेच नेहमी आपलं म्हणणं खरे ठरवायचं ठरवलं, तर तिथे तणाव निर्माण होतो. याच विषयावर समुपदेशक मानसी तांबे-चांदोरीकर यांनी एका समुपदेशनाच्या अनुभवातून महत्त्वाचा संदेश दिला.
कस्तुरी (नाव बदललेले) ही 27 वर्षांची तरुणी आईसोबत समुपदेशनासाठी आली होती. तिचं वर्षभरापूर्वी किरणशी लग्न झालं होतं. लग्नानंतरचे सुरुवातीचे काही महिने चांगले गेले. मात्र नंतर छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले. हे वाद इतके वाढले की कस्तुरी कंटाळून माहेरी आली आणि परत जाण्याची तिची इच्छा उरली नाही.
कस्तुरीने सांगितले की, किरण नेहमी स्वतःचं मत पुढे करतो. प्रत्येक वेळी त्याचंच म्हणणं मान्य करावं अशी त्याची अपेक्षा असते. तिचं म्हणणं कितीही योग्य असलं तरी तो ते खोडून काढतो. एखादा निर्णय चुकला तरी तो ते मान्य करत नाही. त्यामुळे तिच्या भावना, अपेक्षा आणि मतांना काहीच महत्त्व उरत नाही. सतत मन मारून राहिल्यामुळे ती मानसिक ताणात होती.

Love relationship
यानंतर किरणलाही समुपदेशनासाठी बोलावण्यात आले. सुरुवातीला तो तयार नव्हता, पण कुटुंबियांच्या आग्रहामुळे आला. पहिल्या काही सत्रांत तो फारसा मोकळा झाला नाही. मात्र हळूहळू संवादातून हे स्पष्ट झाले की, त्याला कस्तुरीवर खूप प्रेम आहे. ती माहेरी गेल्याने तोही अस्वस्थ झाला होता.
समुपदेशकांच्या निरीक्षणातून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. लहानपणापासूनच किरणचा स्वभाव थोडा हुकूमशाही स्वरूपाचा होता. त्याची निर्णयक्षमता चांगली असल्याने घरात आणि ऑफिसमध्ये त्याचा सल्ला घेतला जायचा. त्यामुळे नकळत त्याला स्वतःचं मतच नेहमी योग्य वाटू लागलं. घरच्यांना त्याची सवय होती, पण कस्तुरीला मात्र या स्वभावामुळे घुसमट जाणवत होती.
पुढील सत्रांमध्ये किरणला त्याच्या वागण्याची जाणीव करून देण्यात आली. त्याच्या बोलण्यामुळे कस्तुरीला कसा त्रास होतो, तिच्या भावना कशा दुखावल्या जातात, याची उदाहरणांसह समज दिली गेली. हळूहळू त्याला स्वतःची चूक कळू लागली. त्याने बदल करण्याची तयारी दाखवली आणि प्रयत्नपूर्वक आपल्या वागण्यात सुधारणा केली.
या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट होते, कोणत्याही नात्यात ‘मी’ पेक्षा ‘आपण’ महत्त्वाचे असते. समोरच्याचा आदर केल्याने नातं अधिक घट्ट होतं. एकमेकांना समजून घेणं, संवाद ठेवणं आणि चुका मान्य करण्याची तयारी ठेवणं गरजेचं आहे. आदर दिला तरच आदर मिळतो. आणि नात्यातील ताण आपोआप कमी होतो.





