Relationship: सगळं काही छान सुरू होतं. अनिष आणि अनघाचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. दोघेही आयटी क्षेत्रात नोकरीला होते. लग्नानंतर त्यांनी सुट्टी एन्जॉय केली, फिरायला गेले आणि संसाराची गोड सुरुवात झाली. कामाच्या धावपळीमुळे वेळ कमी मिळायचा, पण तरीही ते एकमेकांसाठी वेळ काढायचे. घरातील वातावरणही आनंदी होतं. मात्र गेल्या एक-दीड वर्षांत परिस्थिती बदलू लागली. छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद व्हायला लागले. सुरुवातीला घरच्यांनी समजावलं, पण उपयोग झाला नाही. पुढे वाद वाढत गेले आणि गेल्या काही महिन्यांत तर सतत भांडणं होऊ लागली. दोघांपैकी कोणीही माघार घ्यायला तयार नव्हतं. शेवटी एका मोठ्या भांडणानंतर अनघा माहेरी निघून गेली आणि दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐकून दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला. घरच्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांना समुपदेशनासाठी आणलं. सुरुवातीला अनिष फारसं बोलत नव्हता. पण हळूहळू तो मोकळा झाला. बोलताना लक्षात आलं की, त्यांच्या वादाची सुरुवात अनिषच्या एका मित्रामुळे झाली होती. त्या मित्राने अनघा आणि तिच्या जुन्या मित्राबद्दल शंका निर्माण केली. कसलीही खात्री न करता अनिषने अनघावर आरोप करायला सुरुवात केली. तिच्यावर टोमणे मारणे, संशय घेणे हे वाढत गेलं. Marriage Counseling and Relationship Counseling अनघाने या विषयावर शांतपणे बोलण्याचा प्रयत्न केला, पण अनिष ऐकायला तयार नव्हता. त्याला वाटत होतं की ती स्वतःचं समर्थन करण्यासाठी काहीतरी सांगेल. त्यामुळे संवादच थांबला. दुसरीकडे, अनघाशी स्वतंत्र सत्रात बोलताना कळलं की ज्याच्यावरून वाद झाले तो तिचा खूप जुना आणि निखळ मित्र होता. तिच्या आई-वडिलांनाही या मैत्रीबद्दल माहिती होती. दोघांशी स्वतंत्र आणि एकत्र सत्र घेतल्यानंतर स्पष्ट झालं की, ही समस्या गैरसमज, संवादाचा अभाव आणि काही वर्तनदोषांमुळे निर्माण झाली होती. शंका मनात ठेवून, एकमेकांशी न बोलता घेतलेले निर्णय नात्याला घातक ठरले. जर सुरुवातीलाच त्यांनी शांतपणे संवाद साधला असता, एकमेकांचं म्हणणं ऐकलं असतं, तर इतकी मोठी समस्या निर्माण झाली नसती. समुपदेशनाच्या पुढील सत्रांत दोघांनाही त्यांच्या चुका समजावून सांगितल्या. एकमेकांच्या भावना ऐकून घेण्याची संधी दिली. हळूहळू दोघांमध्ये मोकळा संवाद सुरू झाला. गैरसमज दूर झाले. अनिषला त्याच्या वर्तनातील दोष जाणवले, तर अनघालाही काही गोष्टी स्पष्टपणे सांगण्याची गरज उमगली. शेवटी दोघांनी मनापासून एकमेकांची माफी मागितली आणि पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. या घटनेतून एकच गोष्ट स्पष्ट होते नातं टिकवायचं असेल तर संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. शंकेवर विश्वास ठेवण्याऐवजी जोडीदारावर विश्वास ठेवणं, शांतपणे चर्चा करणं आणि अहंकार बाजूला ठेवणं गरजेचं आहे. वर्तनातील छोट्या चुका वेळेवर सुधारल्या तर नातं तुटण्यापासून वाचू शकतं.