Relationship Advice: कोणतंही नातं मजबूत ठेवायचं असेल, तर एकमेकांचा आदर करणे खूप गरजेचं असतं. विचार, भावना, इच्छा आणि अपेक्षा यांना समोरच्याकडून महत्त्व मिळालं, तर नातं अधिक घट्ट होतं. एका समुपदेशनाच्या उदाहरणातून ही गोष्ट स्पष्टपणे समोर आली आहे. एका तरुण दांपत्याचं लग्न होऊन साधारण वर्षभर झालं होतं. सुरुवातीचे काही महिने त्यांचं आयुष्य आनंदात चाललं होतं. पण नंतर छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद सुरू झाले. हे वाद हळूहळू वाढत गेले आणि परिस्थिती इतकी बिघडली की पत्नी त्रासून माहेरी परत गेली. तिला पुन्हा सासरी जाण्याची इच्छा उरली नव्हती. ती खूप तणावाखाली होती. समुपदेशनादरम्यान तिने सांगितलं की, पती नेहमी स्वतःचंच म्हणणं खरं ठरवतो. प्रत्येक गोष्टीत त्याचंच मत अंतिम असतं. तिच्या मतांना, भावना आणि अपेक्षांना फारसं महत्त्व दिलं जात नाही. ती त्याच्या मताशी सहमत नसली, तर तो तिला पटेपर्यंत बोलत राहतो आणि शेवटी त्याचंच म्हणणं मान्य करायला भाग पाडतो. या सगळ्या गोष्टींमुळे ती मानसिकदृष्ट्या खूप त्रास सहन करत होती. सतत मन मारून जगावं लागत असल्यामुळे तिच्यावर ताण वाढत होता. त्यांच्या नात्यातील प्रत्येक वादासाठी तिलाच जबाबदार ठरवलं जात असल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. Relationship Advice यानंतर पतीलाही समुपदेशनासाठी बोलावण्यात आलं. सुरुवातीला तो फारसा मोकळेपणाने बोलत नव्हता, पण काही सत्रांनंतर त्याने आपले विचार मांडायला सुरुवात केली. त्याच्या बोलण्यातून हे दिसून आलं की, त्याला आपल्या पत्नीवर प्रेम आहे, पण त्याच्या वागण्यामुळे नात्यात ताण निर्माण होत आहे, याची त्याला जाणीव नव्हती. समुपदेशनादरम्यान हे स्पष्ट झालं की, त्याचा स्वभाव लहानपणापासूनच थोडा हुकूमशाही आहे. घरात आणि कामाच्या ठिकाणी त्याचं मत नेहमी मान्य केलं जात असल्यामुळे तो नकळतपणे तसाच वागत राहिला. मात्र, या स्वभावामुळे जोडीदाराला त्रास होत होता आणि ती भावनिकदृष्ट्या दडपली जात होती. यानंतरच्या सत्रांमध्ये त्याला त्याच्या वागण्याची जाणीव करून देण्यात आली. त्याच्या वागण्यामुळे नात्यात निर्माण होणारा ताण आणि समोरच्याला होणारा त्रास त्याला समजावून सांगितला. हळूहळू त्याला आपली चूक कळली आणि त्याने स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवली. प्रयत्नांमुळे त्याच्या वागण्यात सकारात्मक बदल झाला आणि नातं पुन्हा सावरण्यास मदत झाली. या उदाहरणातून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते की, कोणत्याही नात्यात परस्पर आदर खूप गरजेचा असतो. एकमेकांचे विचार आणि भावना समजून घेतल्या, तर वाद कमी होतात आणि नातं अधिक मजबूत होतं.