Ravichandran Ashwin Statement on Arshdeep Singh : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सध्या सुरू असलेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापनाने डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न दिल्याबद्दल भारताचा माजी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने तीव्र आश्चर्य व्यक्त केले आहे. अश्विनच्या मते, अर्शदीपच्या उत्कृष्ट रेकॉर्डमुळे त्याला जसप्रीत बुमराहच्या नंतरचा दुसरा पसंतीचा वेगवान गोलंदाज मानले पाहिजे.मेलबर्नमध्ये दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून चार विकेट्सनी पराभव झाल्यानंतर अश्विनने ही टिप्पणी केली. अर्शदीप सिंगला संघात स्थान का नाही? अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनलवरील ‘ऐश की बात‘ या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले की, “जर बुमराह खेळत असेल, तर अर्शदीप सिंगचे नाव तुमच्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असले पाहिजे.” तो पुढे म्हणाला, “जर बुमराह खेळत नसेल, तर अर्शदीप तुमच्या संघाचा पहिला मुख्य वेगवान गोलंदाज बनतो. अर्शदीप सिंगला या संघातून सातत्याने प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर का ठेवले जात आहे, हे मला समजत नाहीये. हे खरोखरच माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडे आहे.” हर्षित राणाऐवजी अर्शदीपला प्राधान्य – दुसऱ्या सामन्यात हर्षित राणाने फलंदाजीमध्ये दिलेले योगदान अश्विनला मान्य असले तरी, मेलबर्न क्रिकेट ग्राउंडसारख्या (MCG) खेळपट्टीवर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला बाहेर ठेवणे योग्य नाही, असे त्याचे मत आहे. अश्विन म्हणाला, “नक्कीच, हर्षित राणाचा फलंदाजीचा दिवस चांगला होता. त्याने चांगली फलंदाजी केली, पण मी माझे मत त्याच्याशी जोडून बोलत नाहीये. माझे म्हणणे अर्शदीप सिंगबद्दल आहे.” त्याने निदर्शनास आणले की, अर्शदीप सिंग हा टी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज आहे. हेही वाचा – NZ vs ENG : न्यूझीलंडने रचला इतिहास! तब्बल ४२ वर्षांनंतर इंग्लंडला दुसऱ्यांदा दिला मोठा दणका चॅम्पियन गोलंदाजाला बाहेर ठेवल्यास लय बिघडते – “त्याने २०२४ च्या टी-२० विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती, पण त्यानंतर त्याला सातत्याने बाहेर ठेवले जात आहे, ज्यामुळे त्याची लयही थोडी बिघडली आहे,” असे अश्विनने नमूद केले. अर्शदीपच्या गैरहजेरीत, हर्षित राणाने फलंदाजीला अनुभवी शिवम दुबेच्या आधी येऊन ३३ चेंडूंमध्ये ३५ धावा केल्या, मात्र वेगवान गोलंदाज म्हणून त्याचे योगदान निराशाजनक राहिले. त्याने दोन षटकांत २७ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. हेही वाचा – PKL 2025 Final : दबंग दिल्लीचा थरारक विजय! पुणेरी पलटनवर अवघ्या २ गुणांनी मात करत दुसऱ्यांदा पटकावले PKL चे जेतेपद अश्विनने शेवटी सांगितले, “आपण आशिया चषकात पाहिले की त्याने (अर्शदीप) चांगली गोलंदाजी केली. त्याने दुसऱ्या स्पेलमध्ये खूप चांगले पुनरागमन केले, पण तो लयीत दिसत नव्हता. जर तुम्ही तुमच्या चॅम्पियन गोलंदाजाला खेळवत नसाल, तर तो निरुपयोगी वाटेल. त्यामुळे जर तुम्ही अर्शदीप सिंग असाल, तर ही खरोखरच एक कठीण परिस्थिती आहे. मला आशा आहे की त्याला संघात स्थान मिळेल, ज्याचा तो हक्कदार आहे.”