Rajgurunagar News: चाकणच्या रस्त्यांवर खड्डे, कोंडी अन् आश्वासनांचा मारा! 31 ऑगस्टच्या ‘डेडलाइन’कडे नागरिकांचे लक्ष
Rajgurunagar News: अरुंद रस्ते, अनधिकृत पार्किंग आणि पावसाच्या चिखलाने रस्त्यांची चाळण; दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर.

– रामचंद्र सोनवणे
Rajgurunagar News – चाकण औद्योगिक परिसर, पुणे-नाशिक महामार्ग आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर वाढलेली वाहतूक, रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे, अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणांमुळे वाहनचालक, कामगार व स्थानिक नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. प्रमुख चौकांमध्ये सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असून, काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तासन्तास रस्त्यावर अडकून पडावे लागत आहे.
त्यामुळे ‘सरकारकडून आश्वासने नकोत, आता प्रत्यक्ष कृती हवी,’ अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. चाकण हे देशातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित झाले असून, औद्योगिक वसाहतीतील हजारो कंपन्यांमध्ये लाखो कामगार कार्यरत आहेत. दररोज मोठ्या संख्येने कामगार या परिसरात ये-जा करतात. त्याचबरोबर पुणे-नाशिक महामार्ग तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.
त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक ताण असलेल्या रस्त्यांवर पावसामुळे पडलेले खड्डे, चिखल आणि रस्त्यांच्या कडांची झालेली दुरवस्था यामुळे वाहतूक अधिक धोकादायक बनली आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील चिंबळी फाटा, कुरुळी, आळंदी फाटा, चाकण-तळेगाव चौक, आंबेठाण चौक, शिरोली फाटा तसेच तळेगाव-शिक्रापूर मार्गावरील चाकण-शिक्रापूर चौक, राणूबाईमळा, खराबवाडी, म्हाळुंगे, खालुंब्रे आदी परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे.
अरुंद रस्ता, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, रस्त्याच्या कडेला साचणारा चिखल आणि कंपन्यांकडे जाण्यासाठी काही ठिकाणी दुभाजक तोडण्यात आल्याने वाहतुकीच्या समस्येत आणखी भर पडली आहे. यापूर्वीही चाकण-तळेगाव मार्गावर वाहनांच्या अनेक किलोमीटर लांब रांगा लागून तासन्तास वाहतूक ठप्प झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या कोंडीचा सर्वाधिक फटका औद्योगिक वसाहतीत काम करणार्या कामगारांना आणि परिसरातील गावांतील नागरिकांना बसत आहे.
पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती विशेष धोकादायक ठरत असून, खड्डा चुकविताना अचानक वाहन वळवावे लागल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे खड्डे आणखी मोठे होत असून, रस्त्याच्या कडेला चिखल साचल्याने उपलब्ध रस्ता आणखी अरुंद झाला आहे.
रिक्षाचालक, दुचाकीस्वार आणि दररोज या मार्गावरून प्रवास करणार्या कामगारांसाठी खड्डे हा आता केवळ गैरसोयीचा प्रश्न राहिलेला नाही; तर तो रोजच्या प्रवासातील धोक्याचा विषय बनला आहे. वाहतूक कोंडीत वाहन बंद पडणे, रिक्षा किंवा दुचाकी खड्ड्यात आदळणे, वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहोचता न येणे, इंधनाचा अतिरिक्त खर्च आणि वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा वाढलेला खर्च याचा थेट आर्थिक फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.






