Rahul Gandhi | Rajiv Gandhi : “राहुल गांधी राजीव गांधींपेक्षाही चांगले विचारक”; काँग्रेस नेत्याचं विधान चर्चेत !

Rahul Gandhi | Rajiv Gandhi – कॉंग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे त्यांचे पिता आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यापेक्षाही अधिक चांगले रणनीतीकार आणि विचारक असल्याचे ओव्हरसीज कॉंग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी म्हटले आहे.
हे दोन्ही नेते भारताच्या विचारांचे संरक्षक आहेत. भविष्यात देशाचा पंतप्रधान होण्याचे सर्व गुण राहुल गांधी यांच्याकडे आहेत. तसेच राहुल यांच्या परदेश दौऱ्याबाबत भारतीय जनता पार्टीकडून जी टीका केली जाते आहे ती खोटी आहे असेही पित्रोदा यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्या आगामी अमेरिका दौऱ्याबाबत बोलताना पित्रोदा म्हणाले की ते अधिकृतपणे अमेरिका भेटीवर येत नसून त्यांना व्यक्तीगत स्तरावर कॅपिटल हिलच्या काही लोकांशी चर्चा करायची आहे. तेथील थींकटँकच्या लोकांशी ते चर्चा करतील आणि जॉर्ज टाउन विद्यापीठातही संवाद साधतील.
पित्रोदा म्हणाले की त्यांनी राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, डॉ. मनमोहन सिंग, व्ही. पी. सिंह, एच. डी. देवेगौडा या पंतप्रधानांसोबत काम केले आहे. राहुल गांधी आणि राजीव गांधी यांच्यात फरक एवढाच आहे की राहुल हे अधिक बौध्दिक आणि विचारक आहेत तर राजीव गांधी थोडे जास्त काम करणारे होते. त्यांच्या चिंता एकसारख्या आहेत, त्यांचा डीएनए सारखाच आहे. त्यांचा खरेच अधिक चांगल्या भारताचे निर्माण करण्यावर विश्वास आहे.
या दोघांच्या कोणत्या व्यक्तीगत मोठ्या गरजाही नाहीत. राहुल राजीव यांच्यापेक्षाही चांगले रणनीतीकार आहेत. ते वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या उपरकरणांचा वेगवेगळा अनुभव बाळगून असतात. अगोदर आजी आणि नंतर पिता यांच्या मृत्यूच्या मोठ्या वेदना त्यांना सोसाव्या लागल्या आहेत.
आमच्या संस्थापकांनी जशी कल्पना केली होती तसा भारत निर्माण करण्याचे सामूहिक रूपाने आमचे काम आहे. अखेर राहुल जसे आहेत तशीच त्यांची प्रतिमा आता तयार होताना दिसते आहे. भारत जोडो यात्रेचा त्यात हातभार लागला आहे.
पित्रोदा म्हणाले की अगोदर माध्यमांमध्ये त्यांची तयार केली गेलेली प्रतिमा एका व्यक्तीच्या विरोधातील सुनियोजित अभियानावर आधारित होती. तेथे त्यांना बदनाम करण्यासाठी लाखो- कोट्यवधी रूपये खर्च केले गेले. ते उच्चशिक्षित आहेत तरीही लोक म्हणायचे की ते कॉलेजलाच गेले नाहीत.
खूप पैसा खर्च करून त्यांची खोटी प्रतिमा तयार केली. प्रदीर्घ काळ या विरोधात राहुल गांधी लढत राहीले आणि जिवंत राहीले. अन्य कोणी त्यांच्या जागी असता तर जगला नसता त्यामुळे मी राहुल गांधी यांनाच याचे संपूर्ण श्रेय देतो.
भाजपवर टीका नाव न घेता भारतीय जनता पार्टीवर टीका करताना पित्रोदा म्हणाले तुम्ही सर्वकाळी सर्व लोकांशी खोटे बोलू शकत नाही. दोन कोटी रोजगार निर्माण केले जातील, काळा पैसा परत आणला जाईल असे सांगितले गेले. मात्र तसे झाले नाही. लोक आता हेही पाहु लागले आहेत.





