Pune Shirur Highway : पुणे-शिरूर प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत! देशातील सर्वात मोठ्या ‘उन्नत महामार्गा’च्या कामाला सुरुवात
Pune Shirur Highway : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचा (MSIDC) महत्त्वाकांक्षी प्रकल्प; ७,३०० कोटींच्या निधीतून पुढील ४ वर्षांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.

Pune Shirur Highway – पुणे-शिरूर महामार्गावरील दररोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या लाखो वाहनचालकांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे ते शिरूर दरम्यान देशातील सर्वांत मोठ्या उन्नत महामार्गाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, भविष्यातील प्रवास ट्रॅफिकमुक्त आणि अधिक वेगवान होणार आहे.
वाहनांची प्रचंड वाढ, औद्योगिक वसाहती, निवासी प्रकल्प आणि सातत्याने वाढणारी वाहतूक यामुळे पुणे-शिरूर महामार्ग हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक बनला आहे. विशेषतः खराडी, वाघोली, लोणीकंद, शिक्रापूर आणि शिरूर परिसरात दररोज तासन्तास वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक, कर्मचारी, विद्यार्थी आणि व्यापारी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
मात्र आता या नव्या उन्नत महामार्गामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार असल्याचे चित्र आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी तब्बल 53.4 किलोमीटर असणार आहे. यामध्ये 35.12 किलोमीटरचा सहापदरी उन्नत उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, हा देशातील सर्वांत लांब इलेव्हेटेड कॉरिडोर ठरणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे ते शिरूर हा प्रवास अवघ्या 45 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
तसेच अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्या वाहनांसाठीही हा मार्ग अत्यंत फायदेशीर ठरणार असून मराठवाड्याशी संपर्क अधिक वेगवान होणार आहे. पुणे-शिरूर पट्ट्यात गेल्या काही वर्षांत औद्योगिक आणि निवासी विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने महामार्ग रुंदीकरणासाठी जमीन संपादन करणे अत्यंत कठीण आणि वेळखाऊ ठरत होते.
यावर उपाय म्हणून सध्याच्या महामार्गावरच उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहणाची आवश्यकता कमी होणार असून प्रकल्प जलद गतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
डबल डेकर उड्डाणपूल ठरणार आकर्षण
या प्रकल्पातील सर्वांत आधुनिक आणि महत्त्वाचा भाग म्हणजे रामवाडी ते वाघोली दरम्यान उभारला जाणारा 11.6 किलोमीटरचा डबल डेकर उड्डाणपूल होय. या दुमजली पुलाच्या पहिल्या स्तरावर वाहनांची वाहतूक सुरू राहणार असून, दुसर्या स्तरावर मेट्रो धावणार आहे. त्यामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेला मोठी मदत मिळणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही नवे बळ मिळणार आहे.
विकासाला मिळणार नवे पंख
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी अंदाजे 7,300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या महामार्गाच्या उभारणीची जबाबदारी ‘वेलस्पन’ कंपनीकडे देण्यात आली असून, पुढील चार वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, शिरूर, अहिल्यानगर आणि मराठवाडा या भागांतील औद्योगिक, व्यावसायिक आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. वाहतुकीतील वेळ आणि इंधन बचत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.






