Pune Rain Update – विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह बुधवारी (दि. १) सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावत पुणेकरांची तारांबळ उडवली. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात जोरदार सरींनी रस्त्यावर पाणी-पाणी झाले. काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. जिल्ह्याच्या काही भागात गारांचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावत उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा दिला. शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पावसाचा मुक्काम आजही कायम राहिला. बुधवार सकाळपासूनच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. सकाळपासून सुरू असलेल्या ऊन-सावलीच्या लपंडावानंतर दुपारी शहरासह उपनगरातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दोन ते तीन मिनिटे झालेल्या पावसानंतर आकाश निरभ्र झाल्यामुळे आता पावसाने विश्रांती घेतली असे वाटत होते. वातावरणातील आर्द्रता वाढून नागरिकांना उकाड्याचा अधिक त्रास सहन करावा लागला. अवकाळी पाऊस मात्र, सायंकाळी आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि बघता बघता संपूर्ण शहराला अंधाराने वेढले. सहा ते साडेसहाच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली. अचानक आलेल्या या पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाची आणि पादचाऱ्यांची मोठी धांदल उडाली. पावसाचा जोर इतका होता की, अवघ्या अर्ध्या तासात सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शहरासह जिल्ह्यातील काही भागांत गारांचा पाऊस झाला. शहरात प्रामुख्याने खराडी, बाणेर, औंध, बालेवाडी, म्हाळुंगे, कोथरूड, वारजे, हिंजवडी आणि शिवाजीनगर या परिसरात पावसाचा जोर अधिक होता. तसेच अन्य परिसरातही पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. दरम्यान, पुढील २४ तासासाठी पुणे वेधशाळेने पावसाचा यलो अलर्ट दिला असून, पुढील दोन दिवस दुपारनंतर किंवा सायंकाळी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दुपारी उन्हाचा चटका जाणवेल. त्यानंतर अवकाळी पावसाचा जोर ओसरेल आणि घटलेल्या कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरवात होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. रस्त्यावरून पाण्याचे पाट विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह शहरासह उपनगरात सायंकाळी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले. परिणामी चौकात पाणी साचल्यामुळे वाहतुक मंदावली. त्यामुळे शहरातील काही प्रमुख रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली. काही भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता तर काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या.