Hinjawadi Waterlogging: आयटीनगरी पुन्हा पाण्यात! पीएमआरडीएचे नियोजन फेल, हिंजवडीत रस्त्यांना आले नदीचे स्वरूप
Hinjawadi Waterlogging: माण, हिंजवडी, मारुंजी परिसरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने अनेक वाहने पाण्यात अडकली.

Hinjawadi Waterlogging – आयटी पार्क परिसरासह मुळशी तालुक्यात मागील तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसाने या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. माण, हिंजवडी, मारुंजी, नेरे आणि जांबे या भागांतील प्रमुख रस्ते जलमय झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले. कार्यालयीन वेळेत हजारो आयटी कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभाग व हिंजवडी ग्रामपंचायतच्या अखत्यारीतील अनेक रस्त्यांना गटारेच राहीली नसल्याने पाण्याचा निचरा पूर्णपणे ठप्प झाला. परिणामी संपूर्ण पाणी थेट रस्त्यावर साचले. त्यामुळे आयटी परिसरातील रस्त्यांवर नदी अवतरल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत होते. अनेक ठिकाणी गुडघाभर तर काही ठिकाणी तीन चार फूट पाणी साचल्याने दुचाकी वाहने बंद पडली. तर काही चारचाकी वाहनांमध्येही पाणी शिरल्याच्या घटना घडल्या.
त्यामुळे सर्व शासकीय विभागांचा समन्वय साधून वारंवार बैठकांचा धडाका लावत भीमगर्जना करणाऱ्या पीएमआरडीए प्रशासनाच्या नियोजनाचे तीन तेरा वाजल्याचे चित्र आयटी परिसरात होते. गेल्या वर्षी ही एमआयडीसी भागात हिंजवडी तुंबली असताना या ही वर्षी अनेक मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून आयुक्तांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी माण ग्रामपंचायतचे माजी सदस्य संतोष मोहिते यांनी केली आहे .
माण- हिंजवडी तसेच मारुंजी–नेरे आणि जांबे या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना काही किलोमीटरचा प्रवास करण्यासाठीही बराच वेळ खर्च करावा लागला. कार्यालयात जाणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना वेळेत पोहोचणे कठीण झाले. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पावसाळ्यापूर्वी प्रशासनाच्या केवळ बैठका होतात. कार्यवाही कुठेच होत नाही.
त्यामुळे या गावांची जबाबदारी असलेले पीएमआरडीए प्रशासन प्रत्यक्ष कामाला केव्हा लागणार ? असा संतप्त सवाल नागरीकांनी उपस्थित केला आहे. डेव्हलपमेंट च्या नावाखाली अनेकांनी रस्त्यालगतची गटारे दगड मुरुमांनी बुजविली आहेत. परिणामी सर्व मुख्य रस्ते ओसंडून वाहताना दिसत आहेत.गटारांची खोदाई, साफसफाई, पाणी निचऱ्याची व्यवस्था आणि रस्त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग , एमआयडीसी, स्थानिक ग्रामपंचायती, व संबंधित कुठल्याही विभागाने प्रभावीपणे पार पाडली नाही.
तो राडा-रोडा अजूनही तसाच
गेल्या वर्षी स्व. अजित पवारांच्या पाहणी दौऱ्यांनंतर माण हिंजवडी रस्त्यांलगत काढलेल्या अतिक्रमणांचा राडारोडा अद्याप कायम असल्याने सर्व पाणी मुख्य रस्त्यांवर सखल भागात साचते. रस्त्यालगतच्या जागा मालकाकडून अनेक ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमधील मुरुम आणि मातीचे ढिगारे गटारांमध्ये गेल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. दरवर्षी पावसाळ्यात भरणेवस्ती, राक्षे वस्ती, पांडवनगर, लक्ष्मी चौकाकडून मारुंजी हिंजवडीला जाणाऱ्या रस्त्यांवर तसेच गवारी मळा,
भोईरवाडी, शिंदे वस्ती, मेट्रो कारसेडकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अशी परिस्थिती निर्माण होत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. कोट्यवधी रुपयांची विकासकामे होत असताना मूलभूत जलनिस्सारण व्यवस्था मात्र अपुरी असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.






