पुणे – जमीनीच्या वादातुन तरुणाचा निर्घुन खुन करुन पसार झालेल्या आरोपींना सोलापूरातील मोहोळ येथुन २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात आले. ही कारवाई आंबेगाव पोलिसांनी केली. आरोपींच्या मागावर पोलिसांची चार पथके होती. एका हॉटेलमध्ये जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आरोपी थांबले असताना पोलिसांच्या जाळ्यात सापडले. अमर दिलीप साकोरे (४० रा. संतोषनगर, कात्रज ), मंदार मारुती किवळे ( ३५ , रा. नवीन वसाहत, कात्रज), गिरीष सुभाष बाबरे (२६, रा संतोषनगर, कात्रज) आणि योगेश बाबुराव डोरे ( ३५ , रा. खोपडेनगर कात्रज ) यांना अटक करण्यात आली. शुभम सुभाष चव्हाण असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा हॉटेल व्यवसाय होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रविवारी पहाटे कात्रज येथील साईछत्र अपार्टमेंटच्या मागे शुभम चव्हाणचा बांबू आणि दांडक्याच्या सहाय्याने खून करण्यात आला होता. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर चार पथके आरोपींच्या मागावर पाठवली होती. तांत्रीक विश्लेषणात आरोपी हे मोहोळ येथील कामती गावात असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व पोलीस अंमलदार हणमंत मासाळ, धनाजी धोत्रे, नितीन कातुर्डे यांचे पथक मोहोळला गेले. त्यांना आरोपी हे मंगळवेढा ते सोलापुर महामार्गावरील कामती येथील हॉटेल समाधान समोर मिळुन आले. तेथे ते जेवणाचे पार्सल घेण्यासाठी थांबले होते. यातील एका आरोपीचे नातेवाईक कामती गावात रहातात . या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर, भोजलींग दोडमीसे, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, राजेंद्र वंजारी, पोलीस अंमलदार राजेश गोसावी, हणमंत मासाळ, गणेश दुधाने, प्रसाद टापरे, चेतन गोरे, निलेश जमदाडे, देवकर, प्रकाश विटेकर यांच्या पथकाने केली.