Pune Mumbai Highway – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मंगळवारी (दि. ३) झालेल्या टंकर अपघातानंतर ३२ तासांच्या वाहतूक कोंडीमुळे दळणवळण यंत्रणेचे वाभाडे निघाले. या अपघातामुळे मुंबई-पुणे प्रवासासाठी सक्षम पर्यायी मार्गाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. यापार्श्वभूमीवर शिरूर-खेड-कर्जत हा नवीन पर्यायी मार्ग या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा ठरू शकतो. मात्र, शासन दरबारी हा प्रकल्प लालफितीत अद्यापही अडकून पडला आहे.नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शिरुर-खेड-कर्जत, असा नविन मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केला आहे. या प्रस्तावित मार्गामुळे मराठवाडा येथून मुंबईकडे जाणारी वाहतूक शिरुर -खेड मार्गे थेट कर्जतला जाणार आहे. त्यामुळे मुंबई येथे जाण्यासाठी नविन मार्ग उपलब्ध होणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या हजारांत आहे, त्यामुळे अशी घटना घडली तर या पर्यायी मार्गाने वाहतूक वळविणे शक्य होणार आहे.सद्यस्थितीत मराठवाडा मधून येणाऱ्या वाहनांना मुंबईला जाण्यासाठी चाकण-शिक्रापूर-तळेगाव या मार्गे मुंबईला जावे लागते. चाकण आणि शिरुर येथील एमआयडीसीमुळे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. प्रस्तावित पुणे मुंबई नवीन मार्ग ( संग्रहित फोटो ) मालवाहतूक करणारी वाहनांना जाण्यासाठी सध्या एकच मार्ग अस्तित्वात आहे. त्यामुळे हा नविन मार्ग प्रस्तावित आहे.मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे देशांतर्गत सर्व प्रमुख काॉरिडॉर हे मुंबईशी जोडलेली असणे ही प्राथमिक गरज आहे. मराठवाड्याचा मोठा भाग आणि अहिल्यानगर या क्षेत्रातील मुंबईला जाणारी वाहतूक मुख्यत: पुणे मार्गे जाते. या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीचा थेट परिणाम पुणे-शिरुर या रस्त्याच्या भागातील वाहतूक कोंडीत होतो, त्यानुसार शिरूर मार्गे थेट कर्जत जाणाऱ्या रस्त्याचा एक पर्याय समोर आला. दिवंगत अजित पवारांनी केलेला पाठपुरावा…. शिरूर-खेड-कर्जत हा मार्ग होण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. मागील चार ते पाच वर्षांपासून सदर प्रकल्प बैठकीत मांडला होता. सप्टेंबर 2025 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीत हा मार्गाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेसाठी सादर करा, अशा सूचना केल्या होत्या. मात्र त्यानंतर नगरपालिका, पालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुकांमुळे या प्रस्तावास अपेक्षित गती मिळाली नसल्याचे समोर आले आहे. प्रकल्पाची ठळक वैशिष्टे… – शिरुर ते कर्जत सुमारे 135 कि.मी. मार्ग – कर्जंत मार्ग पुढे पनवेल-उरणला जोडणार – मुंबईला जाण्यासाठी नवा चार पदरी मार्ग – 670 हेक्टर जागेचे संपादन करावे लागणार – बीओटी तत्वावर प्रकल्पाची उभारणी – मार्गावर पाच बोगदे, ६ मोठे, ४८ लहान पूल