पुणे – कोविड आजारातून बरे झालेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास जाणवत असल्यास त्यांना तात्काळ औषधोपचार आणि समुपदेशन मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात “पोस्ट कोविड ओपीडी’ सुरु करण्यात येणार आहे. सध्या, पुण्यातील दोन्ही जम्बो रुग्णालये, ससून रुग्णालय, बाणेर कोविड रुग्णालय व नायडू रुग्णालय अशा पाच रुग्णालयांत ही ओपीडी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
“कोविड व्यवस्थापन’ आढवाबाबत शुक्रवारी (दि. 2) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे बैठक पार पडली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (व्हिसीद्वारे), महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, वंदना चव्हाण यांच्यासह आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त व अधिक्षक यासह अन्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, शहरातील पाच रुग्णालयात ही ओपीडी सुरु झाल्यानंतर अन्य रुग्णालये व ग्रामीण भागातही टप्प्याटप्प्याने ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. कोविड रुग्णांवर उपचार करताना आयुष मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. ग्रामीण भागातील वैद्यकीय उपकरणे दुरुस्ती अभावी बंद राहू नयेत, याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, शहरात बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आरटीपीसीआरसह अन्य चाचण्या वाढवणे आवश्यक आहे. तर, नागरिकांच्या तपासण्यांसाठी रॅपिड अँटीजेन चाचणी बरोबरच अन्य अत्याधुनिक तंत्रांचा वापर व्हावा, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. करोना आजारातून बरे झालेल्या नागरिकांना सौम्य अथवा गंभीर शारीरिक त्रास जाणवू शकतो, हे गृहीत धरुन “पोस्ट कोविड व्यवस्थापन’ आवश्यक आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांचे सहकार्य गरजेचे आहे, असे डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले.
…अन्यथा कारवाई करा
ग्रामीण भागातील रुग्णालयांमधील उपचारासाठीचे दर निश्चित करण्यात येणार आहेत. तसेच कोविड रुग्णांकडून अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.