Raj Thackeray : राजकीय घडामोडींना वेग; सहा खासदारांच्या बंडानंतर राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, घेतला मोठा निर्णय
Raj Thackeray : मात्र, 20 जून रोजी ठाण्यातील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महत्त्वपूर्ण मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger ) अखेर यशस्वी ठरल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला सहाही कथित बंडखोर खासदार गैरहजर राहिल्याने त्यांच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
पक्षाने व्हीप जारी करून सर्व खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, नऊपैकी सहा खासदारांनी या व्हीपकडे दुर्लक्ष करत बैठकीला दांडी मारली. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. (Raj Thackeray)
या घडामोडींनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीवर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, 20 जून रोजी ठाण्यातील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महत्त्वपूर्ण मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात मनसेचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, राज ठाकरे त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. (Raj Thackeray)

Raj Thackeray : राजकीय घडामोडींना वेग; सहा खासदारांच्या बंडानंतर राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, घेतला मोठा निर्णय
दरम्यान, ठाकरे गटातील खासदारांच्या बंडामुळे पक्षात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांवर तीव्र शब्दांत टीका करत नाराजी व्यक्त केली. राज्यातील अनेक नेत्यांनीही या खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Raj Thackeray)
राजकीय वातावरण तापलेले असतानाच मुंबईतील काही भागांमध्ये जैन साधूंसाठी आखण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून मनसे आणि जैन समाजामध्येही वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे मनसेचा आगामी मेळावा आणखी चर्चेचा विषय ठरला आहे.
दुसरीकडे, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली होती. इतर पक्ष फोडण्याऐवजी स्वतःचे कार्यकर्ते तयार करावेत, असा टोला त्यांनी लगावला होता. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले होते.
आता ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीनंतर राज ठाकरे कोणती भूमिका मांडतात आणि मनसेच्या पुढील राजकीय रणनीतीबाबत काय संकेत देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Operation Tiger : काय झाडी? काय डोंगरनंतर आता बंडखोर 6 खासदार ‘या’ ठिकाणी असल्याची माहिती समोर…





