Sanjay Raut : आता मोकळीक द्यायची नाही, धडा शिकवायचा; खासदार फुटीसंदर्भात शरद पवारांचा संजय राऊतांना फोन
Sanjay Raut : पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना यापुढे मोकळीक देता कामा नये, अशी भूमिका पवारांनी व्यक्त केल्याचे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्याच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) चांगलाच आक्रमक झाला आहे. नवी दिल्लीत आज पक्षाच्या खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून, सर्व सदस्यांना उपस्थित राहण्याचा व्हीप जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केवळ तीनच खासदार बैठकीला आले असल्याची माहिती मिळत आहे.
या बैठकीपूर्वी खासदार संजय राऊत आणि लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांना थेट इशारा देत बैठकीला गैरहजर राहणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
शरद पवारांचा फोन आला : राऊत
यावेळी राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचाही फोन आला होता. पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना यापुढे मोकळीक देता कामा नये, अशी भूमिका पवारांनी व्यक्त केल्याचे संजय राऊत म्हणाले.
“मतदारसंघात जाऊन त्यांच्याविरोधात सभा घ्यायच्या, जनतेसमोर त्यांची भूमिका मांडायची. आवश्यक असेल तर मी स्वतः त्या भागात सभा घेण्यासाठी तयार आहे,” असे पवारांनी सांगितल्याचे राऊत यांनी म्हणाले.
..तर त्याला धडा शिकवायचाच : राऊतांचा इशारा
यावेळी संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण करून देत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले. पत्रकार परिषद संपवताना त्यांनी, “आता कोणीही फुटला तर त्याला धडा शिकवायचाच,” अशा कडक शब्दांत इशारा दिला.
शिंदेसेनेसह भाजपवर घणाघाती टीका
“महाराष्ट्राचा गोलपीटा झाला आहे हे मान्य केलं पाहिजे. आमदार, खासदार निवडून येतात आणि पैशाची प्रलोभनं दाखवल्यावर जातात. यात भाजपाचं योगदान आहे. शिंदे गटातील सगळे दलाल आहेत. हे दलाल निर्माण कऱण्याचं काम भाजपाचं करुन देश आणि राज्याच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासला आहे,” अशा शब्दांत संताप व्यक्त करत संजय राऊतांनी शिंदेसेनेसह भाजपवर घणाघाती टीका केली.
दरम्यान, आजच्या बैठकीला कोणते खासदार उपस्थित राहतात आणि कोण गैरहजर राहतात, यावरून ठाकरे गटाची पुढील रणनीती ठरणार आहे. बैठकीला गैरहजर राहणाऱ्या खासदारांवर पक्ष कोणती कारवाई करतो, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Sanjay Raut : “इतिहास भाजपला कधीच माफ करणार नाही”; ‘ऑपरेशन टायगर’वरुन संजय राऊतांची आक्रमक भूमिका






