प्रभात वृत्तसेवा पुणे – अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस बाकी असले तरी भाजप-शिवसेनेतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. रविवारी होणारा निर्णय सोमवारवर गेला आहे. जागावाटपचा तिढा आणि युती होणार की नाही हेही उद्या स्पष्ट होईल. मात्र, यामुळे पक्षात येणारे आणि बाहेर जाणाऱ्यांची द्विधा स्थिती झाली आहे.युती जाहीर झाल्यावर पहिली बैठक १८ डिसेंबरला झाली. त्याला दहा दिवस झाले तरी जागावाटप मार्गी लागलेले नाही. भाजपने देऊ केलेल्या १५ शिवसेनेला अमान्य असून ते २५ जागांवर आग्रही आहेत. शनिवारी शिवसेनेची बैठक होऊन अंतिम यादी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांना पाठवल्यानंतर रविवारी निर्णय होईल असे नेत्यांनी स्पष्ट केले. मुंबईत बैठक झाली तरी मार्ग निघाला नाही. आता या चर्चेत आणखी एका मंत्र्याचा समावेश झाला असून त्यातील निष्कर्ष सोमवारी दुपारी हाती येण्याची चिन्हे आहेत. भाजप शिवसेनेला १५ जागा देत आहे. या जागाही शिवसेनेची ताकद कमी असेलेल्या भागातील आहे. तेथे १५ पैकी सात-आठच जागा निवडून येतील अशी स्थिती आहे. जेथे ताकद आहे, त्याच जागा मिळाव्या, अशी सेनेची भूमिका आहे. अन्यथा युती नसली तरी चालेल. किमान सामान्य शिवसैनिकांना संधी मिळेल, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.