Pimpri Chinchwad: पालिकेवर घरकुलवासीयांचा ‘जनआक्रोश’! १२ वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नांवर आयुक्तांच्या दारात धडक
Pimpri Chinchwad: प्रशासनाने निश्चित कालमर्यादेत ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा; मोर्चात महिला आणि भाजी मंडई धारक मोठ्या संख्येने सहभागी.

Pimpri Chinchwad – घरकुल परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत नागरी समस्यांवर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा, या मागणीसाठी आज घरकुल परिसरातील नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. आंदोलनामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच भाजी मंडई धारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व मारुती गणपत जाधव यांनी केले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घरकुल परिसरातील गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध नागरी समस्यांवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. प्रमुख मागण्यांमध्ये एसटीपीचे दूषित पाणी घरकुल परिसरात येणे कायमस्वरूपी बंद करणे, अनेक वर्षांपासून बंद असलेली भाजी मंडई सुरू करणे, अपूर्ण सांस्कृतिक भवन नागरिकांसाठी खुले करणे,
व्यायामशाळा सुरू करणे, अंगणवाडी व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, मुख्य प्रवेशद्वारावर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमणे, स्टॉर्म वॉटर लाइनची नियमित स्वच्छता व दुरुस्ती करणे, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे तसेच घरकुल परिसरासाठी विशेष विकास कृती आराखडा जाहीर करणे आदी मागण्यांचा समावेश होता. यावेळी काँग्रेसचे नेते सोमनाथ शेळके, सुग्रीव पाटील, सुरेश वैरागर, रमेश शिंदे, संजय तळेकरी, सुरज देशमाने, दत्तात्रय डोके, तानाजी हावळे, संदीप रोकडे, दिपक कांबळे, सुधाकर कदम, संग्राम पवार,
विकास गायकवाड, सूर्यवंशी, दिपक नवरतणे, वैभव माळशिरस, गणपत जाधव, सुशांत बनसोडे, गणेश देवगिरे, फरान तसेच घरकुल परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सर्व भाजी मंडई धारक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की, वारंवार निवेदने देऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासनाने निश्चित कालमर्यादेत ठोस निर्णय घेऊन कामे सुरू न केल्यास यापेक्षा तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल.






