Wai News: ऐन पावसाळ्यात १३५० कुटुंबांचे संसार उघड्यावर? वाई तालुक्यात घरकुल योजनेचा बोजवारा, नक्की काय घडलं?
Wai News: वाई तालुक्यात मंजूर १८०० पैकी १३५० घरकुले अजूनही अपूर्ण; मागील दोन महिन्यांपासून हप्ते न मिळाल्याने लाभार्थी अडचणीत.

Wai News – वाई तालुक्यात प्रधानमंत्री मोदी आवास घरकुल योजना, रमाई आंबेडकर आवास योजनेच्या अंतर्गत हजारो घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यावेळी हजारो घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी अनेक घरकुले पूर्णही झाली. काही घरकुले अजूनही अपूर्ण आहेत. मात्र, मागील दोन महिन्यांपासून तालुक्यातील प्रधानमंत्री मोदी आवास योजनेस निधी मिळाला नसल्यामुळे वाई तालुक्यातील घरकुल लाभार्थी अडचणीत आले असून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर लाभार्थ्यांचे संसार उघडे पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
राज्य शासनाने प्रधानमंत्री मोदी आवास घरकुल योजनेत सुरुवात केली. या मोदी आवास योजनेत ओबीसीतील वंचित घटकांचा तसेच प्रलंबित यादीतील घरकुल लाभार्थ्यांचा ज्यांची कच्ची घरे अथवा बेघर व गरजवंतांना हक्काचे घरकुल मिळावे म्हणून समावेश करण्यात आला. या योजनेतील लाभार्थ्यांना अन्य योजनेप्रमाणे दीड लाखांचा निधी दिला जातो. सुमारे चार टप्प्यांत हा निधी प्रशासनाकडून वितरित केला जातो.
गेल्या दोन महिन्यांच्या पूर्वी काही लाभार्थ्यांना एक दोन हप्ते मिळाले होते. मात्र, दोन महिने उलटूनही कित्येकांना दुसरा काहींना तिसरा हप्ता मिळत नसल्याने घरकुल लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. लाभार्थ्यांनी आपली राहते घरी घरकुलासाठी तोडल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर लाभार्थ्यांच्या संसाराला निसर्गाच्या प्रवाहाचा सामना करावा लागणार आहे. घरकुल लाभार्थी ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये चकरा मारून कंटाळले आहेत.
मात्र, अधिकारी या योजनेमध्ये पैसे उपलब्ध नसल्याचे कारण देत असल्याने लाभार्थी अधिकच अडचणीत सापडले आहेत. तसेच आपले राहते घर खोलून आजूबाजूला भाड्याने राहावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत असल्याने तेही नुकसान सहन करण्याची वेळ आता घरकुल लाभार्थ्यांवर येऊन ठेपली आहे. या घरकुल आवास योजनेमध्ये लाभार्थ्यांनी आपली घरे खोलून पडत्या पावसात दिवस काढण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
सोबतच आजूबाजूला भाड्याने राहत लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून तात्काळ यावर कार्यवाही करून घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी वाई तालुक्यात जोर धरू लागली आहे. वाई तालुक्यातील एकूण 1800 घरकुल लाभार्थी आहेत. त्यापैकी 450 घरकुलांची कामे पूर्ण झाली असून १३५० घरकुले सद्यस्थितीत अपूर्ण असल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरकुल लाभार्थ्यांच्या कुटुंबावर पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ आल्याने घरकुल लाभार्थी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.






