प्रा. विकास देशपांडे
आज डॉ. राम मनोहर लोहिया यांची जयंती (23 मार्च 1910). त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा…
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या निर्णायक कालखंडात 1942 ते 47 तसेच स्वातंत्र्योत्तर काळातही स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यांवर अपार श्रद्धा ठेवून निर्भय सामाजिक-राजकीय जीवन व्यतीत करणारे डॉ. राम मनोहर लोहिया एक आगळे व्यक्तिमत्त्व होते. कलकत्ता येथे पदवी शिक्षण (इंग्लिश ओनर्स) घेतले व पुढे उच्च शिक्षणासाठी इंग्लंडची रूढ असलेली वाट सोडून त्यांनी जर्मनीची निवड केली. हम्बोल्ट विद्यापीठातून डॉक्टरेट प्राप्त केली. शोधनिबंधाचा विषय होता “भारतातील गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेला मिठाचा सत्याग्रह’, या काळात जर्मनीत नाझीवादाचा उदय होत होता. समाजवाद माघार घेत होता. नाजीवादात संकल्पशक्ती आहे, असे त्यावेळी त्यांना वाटले. समाजवाद सिद्धांत म्हणून चांगला असला तरी त्यात संकल्प शक्तीचा अभाव आहे, असे त्या काळात त्यांना वाटे. भारतात परत आल्यावर 1934 साली स्थापित समाजवादी पक्षात ते दाखल झाले. एवढेच नव्हे तर कार्यक्रम तयार करणाऱ्या सभासदांमध्ये त्यांना आचार्य नरेंद्र देव, जय प्रकाश, अब्दुल वारी, पुरुषोत्तम दास, मिनू मसानी, संपूर्णानंद, चारुचंद्र, फरीद अन्सारी, अब्दुल कलीम, एन. जी. रंगा यांच्याबरोबर स्थान मिळाले.
सन 1947 पूर्वी कॉंग्रेसच्या अंतर्गत राहून समाजवादी काम होत असे. समाजवादी कार्यक्रमांचा आग्रह धरून किसान कामगारांना अनुकूल धोरणे कॉंग्रेसने राबविण्यासाठी समाजवाद्यांचा प्रयत्न असे. कॉंग्रेसच्या अधिवेशनात 9 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटिशांना “चले जाव’चा आदेश देणारा ठराव झाल्यानंतर समाजवादी नेते जयप्रकाश, लोहिया व अन्य नेते भूमिगत झाले. लोहियांनी कसारा घाटात भूमिगत रेडिओ केंद्र चालविले. उषा मेहता या त्यांच्या प्रमुख सहकारी होत्या. रेडिओवरून लोकांना लढ्याची माहिती देऊन चळवळी करता कार्यप्रवृत्त केले जात असे. भूमिगत समाजवादी नेते डॉ. लोहिया, श्रीमती अरुणा असफ अली, एस. एम. जोशी व अच्युतराव पटवर्धन यांची समिती भूमिगत आंदोलनाचे समन्वयन करत असे. बिहार-नेपाळच्या सरहद्दीवर उत्तर भारतात काम करण्यासाठी “आझाद दस्ता’ संघटित करून इंग्रजांविरुद्ध घातपाती कारवाया करण्यात जयप्रकाश-लोहिया आघाडीवर होते. या कारवायांमध्ये मानवी हत्या टाळून रेल्वे लाइन निकामी करणे, पोस्ट टेलिग्राम बंद करणे, खेड्यापाड्यात सामोपचाराने वाद निकाली करून ब्रिटिश कोर्टावर बहिष्कार टाकल्याने मुली व तरुणांच्या स्वातंत्र्यवादी प्रभात फेऱ्या काढणे, अशी कामे जोरदारपणे करण्यात आली. 9 ऑगस्ट 1942 रोजी भूमिगत झाल्यावर लोहिया 44 साल येईतो कुठे होते हे गूढ आहे. इंग्रजांनी पकडल्यानंतर “मी काय केले हे फार तर मी सांगू शकेल पण कोणाबद्दल मी काही सांगणार नाही’, अशी निर्भय भूमिका त्यांनी घेतली होती.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच 1948 मध्ये महात्मा गांधीजींची हत्या झाली. कॉंग्रेस अंतर्गत काम करणाऱ्या समाजवादी पक्षाने कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय घेऊन स्वतंत्र असा समाजवादी पक्ष स्थापन केला. समाजवादी नेते समाजवादाबद्दल जनतेत विशेषत: तरुण लोकांत जी आपलेपणाची भावना होती त्याचा फायदा घेऊ पाहात असावे. जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करून आपल्या पक्षाची लढाऊ भूमिका जनतेमध्ये लोकप्रिय करून पक्षाचे सत्तारूढ पक्षाला पर्याय असा परिचय दृढ करण्यासाठी प्रयत्न करण्यावर लोहियांचा भर होता. त्या अनुषंगाने स्वातंत्र्योत्तर काळात प्रारंभापासूनच त्यांनी प्रयत्न केले. नायमगंज (उत्तर प्रदेश) कालव्याच्या पाण्यावरील करवाढीच्या विरोधात मणिपूर संस्थानात प्रातिनिधिक सरकार यावे म्हणून केलेली चळवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील जिल्हा स्तरावरील चळवळी, गोव्यात नागरिकांच्या लोकशाही स्वातंत्र्यासाठी मडगावात जाहीर सभा बंदी हुकूम मोडून घेणे अशी अनेक आंदोलने लोहियांनी केली. पंडित नेहरूंविरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली. त्यात ते पराभूत झाले. तरी पण त्यांना चांगली मते मिळाली.
पुढे कनोज (उत्तर प्रदेश) लोकसभा पोटनिवडणुकीत ते निवडून आले. लोहियांनी लोकसभेचे वातानुकूलित सभागृह धगधगणारे अग्निकुंडच बनवले. भारतातील अन्नधान्य उत्पादन व त्याचे वितरण, परराष्ट्र धोरण, जनतेचे दारिद्य्र व उपासमार असे अनेक प्रश्न लोकसभेच्या राष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित केले. नेहरूंच्या काळात कृषी आणि औद्योगिक उत्पादनात वाढ होत असली तरी सामान्य माणसाचे जीवनमान इतके खालावले की दारिद्री माणसाचे जवळपास 27 कोटी लोकांचे दरडोई दैनिक उत्पन्न केवळ 3 आणे आहे. असे सप्रमाण दाखवून सत्ता पक्षाचा विकासाचा देखावा तकलादू आहे असे चित्र जनतेसमोर ठेवण्यात ते बव्हंशी यशस्वी झाले. 1967 च्या निवडणुकीत त्यांनी गैर-कॉंग्रेसवादी राजकारणाचा पुरस्कार केला. तो बराच यशस्वी झाला. केंद्रात कॉंग्रेसला अल्प बहुमत मिळाले तरी अनेक राज्यात बिगर कॉंग्रेस संयुक्त विधायक दलाची सरकारे सत्तारूढ झाली. केंद्रातही सत्ताबदल होऊ शकतो, असं वातावरण तयार होत असतानाच डॉ. लोहियांना “प्रोस्टेट ग्लॅंड’ शस्त्रक्रियेस सामोरे जावे लागले.
शस्त्रक्रियेमुळे झालेल्या जखमेत बरीच गुंतागुंत झाल्यामुळे मृत्यूशी झुंज देत असतानाच 12 ऑक्टोबर 1967 रोजी काळाने त्यांच्यावर झडप घातली. विद्युत दहनभूमीच्या आवारात त्यांच्यावर झालेल्या दुखवटा सभेत त्यांच्या लढ्याचे सहनायक जयप्रकाश हे अश्रू अनावर झाल्यामुळे बोलू शकले नाही. पुढे भारताचे राष्ट्रपती झालेले एन. संजीव रेड्डी म्हणाले, “ज्याने साम्राज्यवादास भस्मसात केले तो क्रांतिवीर आज अग्निअर्पण होत आहे. एक संपूर्ण सामाजिक-राजकीय परिवर्तनासाठी धडपडणारा वीर लढा अर्ध्या वाटेवर सोडून गेले. समतेचीच चळवळ पोरकी झाली.
23 मार्च लोहियांचा जन्मदिन हाच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा हौतात्म्य दिन असल्यामुळे लोहियांनी आपला जन्मदिन महोत्सवी स्वरूपात साजरा केला नाही. या हौतात्म्यानंतरच कॉंग्रेसला स्वातंत्र्यासाठी निर्णायक भूमिका घेणे भाग झाले व संपूर्ण स्वातंत्र्य हेच आपले अंतिम ध्येय असल्याचे घोषित करावे लागले. लालाजींना ब्रिटिशांच्या लाठ्यांचा मार वर्मी बसल्यामुळे त्यांचे लवकरच निधन झाले. याचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी केलेल्या क्रांतिकार्याच्या परिणामी त्यांचे बलिदान झाले. कॉंग्रेसने 9 ऑगस्ट 1942 रोजी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव केला. त्यामुळे भारताचे स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी साकार झाले.