Pawanraje Nimbalkar Case : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर; ‘या’ दिवशी लागणार निकाल
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar Case) हत्याकांड प्रकरणात आज, १६ जून रोजी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Pawanraje Nimbalkar Case : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar Case) हत्याकांड प्रकरणात आज, १६ जून रोजी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्याचा अंतिम निकाल (Pawanraje Nimbalkar Case) आज मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाकडून जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, न्यायालयाने आज निकाल न देता पुढील तारीख जाहीर केल्यामुळे या प्रकरणाचा फैसला आता आणखी काही दिवस लांबणीवर पडला आहे.
कोर्टात काय घडले?
आज मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात या खटल्याची महत्त्वाची सुनावणी पार पडली. या खटल्यातील मुख्य आरोपी आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व ९ आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. माजी खासदार पद्मसिंह पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावलेली असल्याने, त्यांना विशेष वैद्यकीय सुविधेसह रुग्णवाहिकेतून (एम्बुलन्स) सेशन कोर्टात आणण्यात आले होते.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि प्रदीर्घ प्रतिक्षेनंतरही आज न्यायालयाने अंतिम निकाल वाचन केले नाही. “निकालाची प्रत पूर्णपणे तयार करण्यासाठी न्यायालयाला आणखी काही दिवसांचा अवधी आवश्यक आहे,” असे स्पष्ट करत न्यायमूर्तींनी या प्रकरणाचा अंतिम निकाल आता २० जून रोजी सुनावला जाईल, असे जाहीर केले.
20 वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष आणि कायदेशीर लढाई
पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar Case) यांच्या हत्येची ही थरारक घटना तब्बल २० वर्षांपूर्वी घडली होती. या दोन दशकांच्या काळात या हायप्रोफाइल खटल्यामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. साक्षीदारांच्या उलटतपासण्या, विविध तांत्रिक याचिका आणि कायदेशीर विलंबाच्या चक्रव्यूहामुळे हा खटला वर्षानुवर्षे रेंगाळत गेला. या प्रकरणात माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण ९ जणांवर हत्येचा कट रचल्याचा आणि अंमलबजावणी केल्याचा गंभीर आरोप आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर भावूक
निकालाच्या पार्श्वभूमीवर पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी न्यायालयाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या तीव्र आणि भावूक भावना व्यक्त केल्या.”माझे वडील पवनराजे निंबाळकर साहेब आणि त्यांचे निष्पाप चालक समद काझी यांची अत्यंत निष्ठूरपणे हत्या करून आज सुमारे २० वर्षे पूर्ण झाली आहेत. आमची दोन्ही कुटुंबे आजही न्यायाच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसली आहेत. आज न्यायदेवता योग्य न्याय करेल आणि ज्यांनी रक्ताच्या नात्याला काळीमा फासला, त्यांचा आज फैसला होईल अशी आम्हाला मोठी अपेक्षा होती.”
ओमराजे यांनी पुढे बोलताना या लढाईचे स्वरूप स्पष्ट केले आणि म्हणाले, “हा खटला केवळ एका हत्येचा खटला नाही, तर मस्तवाल राजकीय शक्ती आणि पैशाच्या मस्तीवर सर्वसामान्य लोकांना आपले गुलाम समजणाऱ्या, लोकांच्या जीवाची काहीच किंमत न करणाऱ्या आणि रक्ताच्या नात्याचा क्रूरपणे घात करणाऱ्या विकृत मानसिकतेविरुद्धचा हा आमचा प्रदीर्घ संघर्ष आहे.”
न्यायालयाने दिलेल्या नवीन तारखेनुसार आता येत्या २० जून रोजी या ऐतिहासिक आणि वादग्रस्त खटल्याचा निकाल लागणार आहे. या निकालाकडे केवळ निंबाळकर कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.





