Pawanraje Nimbalkar Case : 20 वर्षे 13 दिवस संघर्षाची, अपेक्षा न्यायाची; निकाल पुढे ढकल्याने ओमराजेंची भावूक पोस्ट
Pawanraje Nimbalkar Case : निकाल पुढे ढकल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावरुन एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

Pawanraje Nimbalkar Case : राज्याच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाने आज निकाल जाहीर न करता तो पुढे ढकलला आहे. न्यायालयाने निकाल तयार करण्यासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे नमूद करत पुढील सुनावणीची तारीख 20 जून निश्चित केली आहे. निकाल पुढे ढकल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावरुन एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
कोर्टात काय घडलं? (Pawanraje Nimbalkar Case )
आज सकाळी 11 वाजता मुंबई सत्र न्यायालयात या बहुचर्चित खटल्याची सुनावणी सुरू झाली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर, जयराजे निंबाळकर, आनंदीदेवी निंबाळकर तसेच दिवंगत चालक समद काझी यांचे कुटुंबीय न्यायालयात उपस्थित होते.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील प्रकृती अस्वास्थ्यामुळे अॅम्ब्युलन्समधून न्यायालयात दाखल झाले. न्यायालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर सर्व आरोपींची उपस्थिती नोंदवण्यात आली. मात्र, निकालाचे सविस्तर वाचन आणि अंतिम आदेश तयार करण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याने न्यायालयाने निकाल पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : Ankita Walawalkar: ‘मी कान्समध्ये का गेले?’; ट्रोलर्सना कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचं सडेतोड उत्तर
नेमकं प्रकरण काय? (Pawanraje Nimbalkar Case )
3 जून 2006 रोजी मुंबईहून उस्मानाबादकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात त्यांचे चालक समद काझी यांचाही मृत्यू झाला होता. दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून हा गोळीबार केल्याचा आरोप आहे.
सुपारी देऊन हत्या (Pawanraje Nimbalkar Case )
या प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ जण आरोपी आहेत. राजकीय वैरातून 25 लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा आरोप केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) केला आहे. गेली दोन दशके न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या या खटल्याचा निकाल आता 20 जून रोजी लागण्याची शक्यता असून, त्याकडे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
20 वर्षे 13 दिवस संघर्षाची , अपेक्षा न्यायाची.
माझे वडील पवनराजे निंबाळकर साहेब व त्यांचे चालक समद काझी यांची निष्ठूर हत्या होऊन सुमारे 20 वर्षे झाली. अजूनही आम्ही दोन्ही कुटुंबीय न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. आज न्यायदेवता न्याय करणार आणि ज्यांनी रक्ताच्या नात्याला काळीमा… pic.twitter.com/hSDhHrwIuy
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) June 16, 2026
खासदार ओमराजे निंबाळकर यांची भावूक पोस्ट
20 वर्षे 13 दिवस संघर्षाची , अपेक्षा न्यायाची.
माझे वडील पवनराजे निंबाळकर साहेब व त्यांचे चालक समद काझी यांची निष्ठूर हत्या होऊन सुमारे 20 वर्षे झाली. अजूनही आम्ही दोन्ही कुटुंबीय न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. आज न्यायदेवता न्याय करणार आणि ज्यांनी रक्ताच्या नात्याला काळीमा फासला अश्याचा आज फैसला होणार ही अपेक्षा.
हा खटला म्हणजे मस्तवाल राजकीय शक्ती व पैशाच्या मस्तीवर लोकांना गुलाम समजणाऱ्या, त्यांच्या जीवाची किंमत नसणाऱ्या, रक्ताच्या नात्याचा घात करणाऱ्या मानसिकतेविरुद्ध हा संघर्ष आहे..!
आजपर्यंत अनेक परीक्षा दिल्या पण कोणत्याच निकालासाठी एवढा वेळ लागला नाही. आज येणाऱ्या या निकालाकडे आमचे दोन्ही कुटुंबीय आस लाऊन न्यायाची अपेक्षा करत आहेत.
न्यायाला उशीर झाला आता त्यावर बोलण्यापेक्षा आज तरी राजेसाहेबांच्या व समद काझी यांच्या खुन्याला कठोर शिक्षा व्हावी एवढीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे.
हेही वाचा : Accident Case: भीषण अपघातात पत्नीचा मृत्यू; कार चालक पतीवर गुन्हा दाखल






