Priyanka Gandhi : “जेन-झीला भागवतांच्या प्रमाणपत्राची गरज नाही…”; प्रियांका गांधींची कडाडून टीका
संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, देशातील तरुणांना मोहन भागवत जी यांच्या प्रमाणपत्राची अजिबात गरज नाही.

Priyanka Gandhi – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी ‘जनरेशन झेड’च्या (जेन-झी) बाजूने ठाम भूमिका घेतल्यानंतर, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी शुक्रवारी त्यांच्या विधानांवर तीव्र शब्दांत टीका केली.
देशातील तरुण पिढीला किंवा ‘जनरेशन झेड’ला मोहन भागवत यांच्या कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे सांगत त्यांनी भागवतांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी ‘जन-झी’चे समर्थन करताना म्हटले होते की, या तरुण पिढीच्या तक्रारी पूर्णपणे रास्त आहेत आणि त्यांच्या प्रामाणिकपणावर आपला पूर्ण विश्वास आहे.
तसेच, तरुणांनी केलेली आंदोलने त्यांना ‘राष्ट्रविरोधी’ ठरवत नाहीत, असे स्पष्ट करत लोकशाहीमध्ये आंदोलन हा संवादाचा एक वैध मार्ग असून त्याचा उद्देश फूट पाडण्याऐवजी एकमत घडवून आणणे हा असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून एका नवीन दबाव गटाने अलीकडेच केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे भाष्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
भागवत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता, संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, देशातील तरुणांना मोहन भागवत जी यांच्या प्रमाणपत्राची अजिबात गरज नाही.
याचवेळी त्यांनी केंद्र सरकारवर आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अमित शहा घाबरलेले आहेत आणि म्हणूनच ते संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये येत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
त्यांनी सभागृहात येऊन निवेदन द्यावे, यात अडचण काय आहे? जर काहीतरी चुकीचे घडले आहे, तर सरकारने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी त्यांनी केली.
२० जुलै रोजी प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावरून शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कथित अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.
भागवतांचा संवाद !
मुंबईत गुरुवारी ‘इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायट नेशन्स’च्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘जेन-झी’ आणि ‘जेन-अल्फा’च्या सुमारे २,००० सदस्यांना संबोधित करताना मोहन भागवत यांनी भारताच्या शिक्षण व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली होती.
शिक्षण क्षेत्रावरील खर्च जीडीपीच्या ६ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची वकिली करत त्यांनी, जर ‘जेन-झी’चे सदस्य आंदोलन करत असतील, तर ते राष्ट्रविरोधी नाहीत, ती आपलीच पुढची पिढी आहे, असे म्हटले होते.
नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणानंतर निर्माण झालेल्या राजकीय गदारोळाच्या वातावरणात आरएसएस प्रमुखांचे हे विधान खूप चर्चेत आले आहे.






