Top 10 News: राष्ट्रवादीत पुन्हा वाद? ते ऋषभ पंतची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची हाक; जाणून घ्या आजच्या Top 10 News…
Top 10 News : राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोड...!

Top 10 News: 1. राष्ट्रवादीत पुन्हा वाद? प्रशांत किशोरांचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला
बिहारमधील नवनिर्वाचित आमदार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. भेटीत त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबद्दल तक्रार केल्याचं समजतं आहे. प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबतच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली. पक्षात दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचे सांगत, भविष्यात पक्षासाठी काम करायचे असल्यास प्रदेशाध्यक्षपदाबाबत ठोस निर्णय घेण्याची अट प्रशांत किशोर यांनी ठेवली. यानंतर सुनिल तटकरे यांनी प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे सल्लागार आहेत, हेच माहिती नसल्याचं सांगत पेच आणखी वाढवला. तसेच “मला कोणत्याही रणनीतीकार किंवा सर्व्हेची गरज नाही; मी ग्राउंडवर काम करणारा नेता आहे,” असा टोला तटकरे यांनी लगावला.
2. आरोपीने सांगितले ती ट्रान्सजेंडर, पण पोलिसांच्या तपासात माहिती उघडं
मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये एका महिला प्रवाशाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोकल ट्रेनमध्ये एका महिलेचा सीटवर झोपण्यावरून एका पुरुष प्रवाशाचा तिच्याशी वाद झाला. वाद वाढल्यानंतर त्याने महिलेला शिवीगाळ केली, तिच्यावर हात उगारला आणि कंबरेचा बेल्ट काढून मारण्याची धमकी दिली. हा गंभीर प्रकार घडत असताना डब्यातील इतर सहप्रवासी शांतपणे पाहत असल्याने सोशल मीडियावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणाचीअंधेरी GRPने प्रकरणाची दखल घेत आरोपीला 12 तासांच्या आत अटक केली. मात्र स्वतःचा बचाव करण्यासाठी आरोपीने भांडण झालेली व्यक्ती महिला नसून ट्रान्सजेंडर असल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांच्या तपासात संबंधित व्यक्ती महिलाच असून नेपाळची नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे.
3. आजही पावसाची शक्यता! सात जिल्ह्यांना येलो अलर्ट
आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पुन्हा पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत आज काही ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. काही भागांत जोरदार वारे वाहण्याची शक्यताही असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे, अल निनोचं संकट तीव्र होत चालल्याने त्याचा प्रभाव वातावरणावर होत आहे. परिणामी पावसाचा जोर कमी झाला असून नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
4. महाराष्ट्रातील 3 जण NEET पेपरफुटीचे मास्टरमाइंड
सीबीआयकडून आरोपपत्रात उल्लेख
नीट-यूजी २०२६च्या पेपरमधील प्रश्नांची माहिती फोडण्यात राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) पी. व्ही. कुलकर्णी (रसायनशास्त्र), मनीषा हवालदार (भौतिकशास्त्र), मनीषा मांढरे (वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र) या तीन विषय तज्ज्ञांचा सर्वात मोठा हात आहे असा दावा सीबीआयने आरोपपत्रात केला आहे. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांच्या खटल्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात सीबीआयने अंतिम दोषारोपपत्र दाखल केले आहे. या ९४ पानी दोषारोपपत्रात या तिघांनी एनटीएच्या गोपनीय विभागातील सुरक्षेतील त्रुटींचा कसा फायदा घेतला, याचा सविस्तर उल्लेख आहे. सीबीआयने २८ जुलै रोजी विशेष न्यायालयात १३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. यात लातूर येथील कोचिंग सेंटर चालक शिवराज मोटेगावकर याचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.
5. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ
आगामी सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. गेल्या महिन्यात साखरेच्या किमती सरासरी ८% ते १५% ने वाढल्या असून घाऊक बाजारात प्रति क्विंटल ४०० रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत साखरेचा दर ४६ वरून ५२ रुपये, तर दिल्लीत ४५ वरुन ४९ रुपयांवर पोहोचला आहे. साखर उत्पादनात झालेली घट हे यामागचे प्रमुख कारण आहे. यंदा २९३ लाख टन उत्पादनाचा अंदाज असताना प्रत्यक्ष उत्पादन २८० लाख टन झाले. त्यातच एल निनोच्या प्रभावामुळे पुढील हंगामातही उत्पादनात घटीची भीती असल्याने बाजारात साठेबाजी आणि घबराट वाढली आहे. दरम्यान, किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि ताज्या साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी साखर कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम १० ते १५ दिवस आधीच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
6. “सर्वोच्च न्यायालय आता प्रत्येकाने गोळ्या झेलाव्यात अशी अपेक्षा करतयं का?”
“स्वातंत्र्यसैनिकांनी तर…” सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणी, दिपकेंकडून नाराजी व्यक्त
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीवरून नवा राजकीय वाद उफाळला आहे. सोशल मीडिया पोस्टप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांसमोर प्रत्यक्ष हजर न राहता ऑनलाइन उपस्थितीची परवानगी मोइत्रा यांनी मागितली होती. विरोधकांकडून अंडी-टोमॅटो फेकले जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. यावर न्यायालयाने “राजकारणात आल्यावर अंडी फेकण्याची भीती कसली? आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी तर छातीवर गोळ्या झेलल्या होत्या” अशी कठोर टिप्पणी करत याचिका फेटाळण्याचे संकेत दिले. त्यानंतर मोइत्रांच्या वकिलांनी याचिका मागे घेतली. यावर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “सर्वोच्च न्यायालय आता प्रत्येकाने गोळ्या झेलाव्यात अशी अपेक्षा करत आहे का? न्यायाधीशांनीच विरोधी नेत्यांविरोधात अशी वक्तव्ये केली, तर सामान्य माणसाने कोणाकडून अपेक्षा ठेवावी?” असा सवाल दीपके यांनी ‘एक्स’वरून उपस्थित केला.
7. चीनचा डाव उलथवण्यासाठी भारताने उचललं मोठं पाऊल
अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणांना अधिकृत नकाशावर स्थान
चीनकडून अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याचा सातत्याने होणारा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अरुणाचल प्रदेश सरकारच्या सहकार्याने केंद्र सरकारने राज्यातील २७ महत्त्वाची ठिकाणे व भौगोलिक वैशिष्ट्ये ‘सर्वे ऑफ इंडिया’च्या अधिकृत नकाशावर नोंदवली आहेत. नकाशात लोंगजू, माजा, जोजि ला, रिझा ला, थाग ला, रामनगर, जसवंत गढ, शेर-ए-थापा मेमोरियल, सांभो सरोवर, जयरामपूर आणि बुद्धमंदिर यांसारख्या २७ महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान,चीन अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगत त्याला ‘झांगनान’ असे संबोधतो आणि अनेकदा तिथल्या ठिकाणांचे चिनी नामांतर करतो. भारताने या कृतींचा निषेध करत अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे ठिकाणांची नावे बदलल्याने अरुणाचल प्रदेशावरील भारताच्या सार्वभौमत्वावर कोणताही परिणाम होत नसल्याचे सांगितले आहे.
8. “व्हाइट हाऊसचे तुम्ही मालक नाही, तर भाडेकरू…”
अमेरिकेच्या कोर्टाने ट्रम्प यांना सुनावले खडेबोल
अमेरिकेच्या न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का देत व्हाइट हाऊसमधील ४०० दशलक्ष डॉलर्सच्या ‘बॉलरूम’ प्रकल्पाचे काम तातडीने थांबवण्याचे आदेश दिले आहेत. कोलंबिया सर्किट न्यायालयाने २-१ अशा बहुमताने दिलेल्या निर्णयात स्पष्ट केले की, राष्ट्राध्यक्ष हे व्हाइट हाऊसचे मालक नसून केवळ ‘तात्पुरते भाडेकरू’ आहेत. कोणत्याहीमंजुरीशिवाय व्हाइट हाऊसच्या रचनेत असा मूलभूत बदल करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना नाही.यानंतर ट्रम्प यांनी ‘ट्रुथ’ या सोशल प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांचे प्रशासन या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करेल. दरम्यान, ईस्ट विंग पाडून ९०,० हजार चौरस फुटांचा बॉलरूम उभारण्याविरोधात ‘नॅशनल ट्रस्ट फॉर हिस्टॉरिक प्रिझर्व्हेशन’ने याचिका दाखल केली होती. न्यायालयाने आदेशाच्या अंमलबजावणीला १४ दिवसांची स्थगिती दिली असून ट्रम्प प्रशासनाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे स्पष्ट केले आहे.
9. क्रिकेटर ऋषभ पंतची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची विनंती
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज ऋषभ पंतने ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे जमीन खरेदीसाठी मदत मागितली आहे. सध्या श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या पंतने दिल्ली सोडून आपल्या मूळ राज्यात स्थायी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘गेल्या ३ वर्षांपासून उत्तराखंडमध्ये राहण्यासाठी योग्य आणि प्रशस्त जमीन शोधत आहे.मात्र, जमीन खरेदी प्रक्रियेतील अडचणींमुळे ही प्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे. जमीन मिळवण्याच्या प्रक्रियेत कृपया मला मदत करावी. मला माझ्या राज्यातील डोंगराळ भागातील लोकांमध्ये राहून उत्तराखंडच्या विकासात योगदान द्यायचे आहे,’ असे पंतने म्हंटले आहे. यावर आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
10 . वरुण धवन नव्या रूपात! हॉरर चित्रपटात करणार एन्ट्री
अभिनेता वरुण धवनने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपहिट चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आता वरुण एका हॉरर चित्रपटात दिसणार आहे. यशराज फिल्म्सच्या या आगामी हॉरर चित्रपटात वरुण धवनची वर्णी लागली आहे. अभय पन्नू यांच्या खांद्यावर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा असून सोबतच त्यांनी हॉरर कथेची पटकथा देखील लिहिली आहे. मिडिया रिपोर्टनुसार,सध्या, वरुणची मुख्य भूमिका असलेल्या या हॉरर चित्रपटाची कथा नेमकी काय असेल याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या चित्रपटाचे चित्रीकरण यावर्षाअखेरीस सुरू होणार असून, २०२७ मध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
हेही वाचा:








