पुणे – कमी पटसंख्येचा शाळा बंद होऊ नये, अशा 16 शाळा एकत्रीकरणाचा प्रयोग म्हणजेच क्लस्टर स्कूल जिल्ह्यातील पानशेत (ता. वेल्हे) येथे राबविण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आता राज्यात सर्व ठिकाणी क्लस्टर शाळा (समूळ) सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यभरात आता पानशेत पॅटर्न राबविण्यात येणार आहे.
क्लस्टर शाळा संदर्भात राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. राज्यातील अतिदुर्गम भागात कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सर्वार्थाने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. त्यामुळेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांचे सामाजिकीकरण होण्यासाठी, त्यांच्यात खेळाडू वृत्ती निर्माण होण्यासाठी, या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी व त्यांना विविध शैक्षणिक साधनसामग्री उपलब्ध होण्यासाठी क्लस्टर स्कूल सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यावर अनेक शिक्षण क्षेत्रात मतमतांतरे आहेत. मात्र, क्लस्टर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला अखेर शासनाने मान्यता दिली आहे.
कमी पटसंख्येच्या शाळेमध्ये शाळांमध्ये दृकश्राव्य साधने, क्रीडांगण,पुरेशा प्रमाणात सहअध्यायी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे गुणवत्ता पूर्ण शिक्षणावर व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर प्रतिकूल परिणाम होताना दिसतात. केवळ शाळेची स्वतःच्या गावात असलेली उपलब्धता सोडली तर मुले खऱ्या शैक्षणिक गुणवत्तेपासून वंचित राहतात. त्यामुळे राज्यातील कमी पटसंख्येच्या काही शाळा एकत्रित करून त्यांची क्लस्टर शाळा सुरू करण्यास राज्याचे उपमुख्यमंत्री (वित्त) यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
क्लस्टर शाळा सुरू करण्यामागे राज्य शासनाचा शाळा बंद करणे किंवा शिक्षकांची पदे कमी करणे, असा उद्देश नाही. तर विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात शैक्षणिक सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्यामध्ये शिक्षणातील विविध अध्ययन क्षमता विकसित होण्यास वाव मिळावा हा आहे, असे राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, क्लस्टर शाळा निवडीचे निकषही प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार
राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्लस्टर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कमी पटसंख्येच्या अनेक शाळा आपोआप बंद होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. हा प्रयोग सर्वच ठिकाणी यशस्वी होईल, याविषयी शिक्षण तज्ज्ञांमध्ये सांशकता व्यक्त केली जात आहे.