पवनानगर, – महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत. असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत. या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच याकडे वळत असतात. त्यातील एक किक्ला म्हण जे तिकोणा, ज्याला पवन मावळचा पाहारेकरी किल्ला असे म्हटले जाते.
पवन मावळात लोहगड विसापूर, तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा त्रिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा त्रिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोणा हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नाव असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोणा किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटीपासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .
किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे. तिकोणा गड पुणे जिल्ह्यात असून पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ किलोमीटर अंतरावर आहे. पवना धरणाचा जलाशय या किल्ल्याचा सोबती भासतो. किल्ल्यापासून जवळ असलेल्या गावाला तिकोणा पेठ म्हणतात. तर, पवन मावळचा हा पहारेकरी त्याच्या माथ्याच्या त्रिकोणी आकारामुळे आपले लक्ष वेधून घेतो आणि त्यामुळेच कदाचित त्याला तिकोणा असे नाव पडले. किल्ल्यावर सातवाहनोत्तर काळातली गुहा आणि टाकी खोदलेली आहेत.
कसा आहे किल्ला
तिकोणा हा सोप्या चढणीचा छोटेखानी किल्ला आहे. वर जायला दोन वाटा आहेत. पूर्वेकडून एक वाट आहे, ती पायथ्याच्या दोन्हीही गावात उतरते. या वाटेवर जाताना एक दरवाजा आहे. त्यानंतर एक मोठी हनुमान मूर्ती आहे. त्याला भिंतीतला हनुमान असे म्हणतात. त्याच्यापुढे एक खडकात खोदलेली गुहा आणि त्याच्यासमोर एक विहीर आहे. इथेच पेठ तिकोणा गावातून उत्तरेकडची वाट येते. ही जरा कठीण असून या वाटेवर सुद्धा तटात एक छोटा दरवाजा आहे.
गुहेकडून बालेकिल्ल्याकडे जाताना एक भलामोठा दगडी चाक सदृश चुन्याचा घाणा लागतो. पूर्वी किल्ल्यांची दुरुस्ती करण्यासाठी सर्व गडांवर असे घाणे असायचे. तिथेच चुना मळून दुरुस्तीला वापरला जायचा. येथे गड भटकंती दुर्ग संवर्धन या संस्थेने बरेच संवर्धनाचे काम केलेले आहे. तेव्हा मातीत गाडला गेलेला हा चुन्याचा घाणा सुद्धा त्यांनी साफ करून घेतला. तसेच वर जायच्या पडलेल्या पायऱ्या बांधून घेतल्या, भिंतीतल्या मारुतीला पण आधार देऊन त्याची पडझड थांबवली.
काय पहाल?
त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर, तटबंदी, दरवाजे, भिंतीतला मारुती, सातवाहन कालीन गुहा, चुन्याचा घाणा, बुरूज, तळजाई देवीचे मंदिर, पाण्याचे खडकात खोदलेले टाके, वाड्याचे आणि सदरेचे अवशेष. तर गडावरून पवना सरोवराचे चांगले दृश्य दिसते. तर पायथ्याला नाश्ता आणि जेवणाची सोय होऊ शकते.
तिकोणा गडावर गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्था गेले १० वर्षांपासून दुर्गसंवर्धनाचे शास्त्रोक्त पद्धतीने काम करत असून आज तागायत गडावर पडझड झालेल्या पायऱया बांधणे, पाण्याची टाकी स्वच्छ करणे, गडावरील मंदिरांची डागडुजी करणे, माहिती फलक लावणे असे अनेक कार्य करण्यात आली आहेत.
संस्थेनी गडाचा विकास आराखडा तयार केला असून त्यावरून गडाकरीता १ कोटी ४७ लाख रूपयांचा चा निधी प्राप्त झाला. संस्थेच्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. गडावर आता मोठ्या प्रमाणात कामे होतील. संस्था गडावरील होणाऱ्या कामामध्ये लक्ष्य देऊन उत्कृष्ट दर्जाचे काम करून घेण्याकरीता प्रयत्न करत आहे. – गणेश जाधव, गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगाव मावळ.