Paddy Crop Damage: आंबेगावच्या आदिवासी भागात पावसाचा हाहाकार! भातशेतीचे कंबरडे मोडले, शेतकरी संकटात
Paddy Crop Damage: जिल्ह्यातील ५,१०० हेक्टर क्षेत्रावरील भातशेती प्रभावित; यंदा भाताचे उत्पादन घटण्याच्या भीतीने आंबेगाव तालुक्यातील आदिवासी शेतकरी हवालदिल.

Paddy Crop Damage – भीमाशंकर आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण आणि आहुपे या भातशेतीच्या भागात यंदा पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच परीक्षा घेतली आहे. भात लागवडीपूर्वी आणि लागवडीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे भात रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि अनेक भातखाचरांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे.
काही ठिकाणी लागवड केलेली भात रोपे पाण्याखाली गाडली गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यंदाच्या भात उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील एकूण ६३,८०० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. त्यापैकी सुमारे ५,१०० हेक्टर क्षेत्र आंबेगाव तालुक्यात भात लागवडीखाली आहे.
आदिवासी शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रांच्या काळात शुभमुहूर्त मानून धुळवाफेत भाताची पेरणी केली. मात्र, रोहिणी व मृग नक्षत्रानंतर आद्रा नक्षत्रात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. भातखाचरांमध्ये पाणी साचल्याने उर्वरित क्षेत्रावर लागवड करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
‘हवा तेव्हा नाही, नको तेव्हा मुसळधार’
यंदा पेरणीच्या काळात पावसाने दिलेली हुलकावणी आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचा फटका भातशेतीला बसला आहे. सुरुवातीला पावसाअभावी बियाण्यांची उगवण विरळ झाली, तर नंतरच्या मुसळधार पावसाने तयार झालेली रोपे आणि लागवड केलेले पीक पाण्याखाली गेले. त्यामुळे ‘पाऊस हवा तेव्हा नाही आणि नको तेव्हा मुसळधार’ अशी अवस्था झाल्याने आदिवासी शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.
‘भाताचे उत्पादन घटण्याची भीती ‘
यंदा सुरुवातीला पाऊस वेळेवर न झाल्याने पेरणी केलेल्या भाताचे बियाणे विरळ उगवले. त्यानंतर मुसळधार पावसामुळे रोपे तयार होण्यापूर्वीच नुकसान झाले. कसेबसे रोपे तयार करून भात लागवड केली; मात्र, आता पुन्हा जोरदार पावसामुळे भातखाचरांत पाणी साचून रोपे गाडली जात आहेत. यामुळे यंदा भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती आहे.



