River Pollution: आंबेगावात खळबळ! साखर कारखान्याचा गाळ नदीकाठावर सोडला; ठेकेदारासह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
River Pollution: ठेकेदार आणि कर्मचाऱ्याचे संगनमत; ३ ऑगस्टच्या रात्री पंप लावून गाळ पातळ करून बाहेर सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस.

River Pollution – पारगाव तर्फे अवसरी (ता.आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी) परिसरातील गाळ परवानगीशिवाय बाहेर सोडून परिसर प्रदूषित केल्याप्रकरणी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात ठेकेदार आणि कारखाना कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गंगाधर ढगे यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, सन २०२५-२६ चा गळीत हंगाम संपल्यानंतर ईटीपीमधील अनट्रीटेड, ट्रीटेड तसेच कंपोस्ट यार्डलगतच्या तळ्यांतील गाळ काढण्याचे काम दीपक एकनाथ करंडे (रा. काठापूर बु., ता. आंबेगाव) यांना २८ एप्रिल २०२६ रोजी देण्यात आले होते. कामाच्या आदेशातील अटींनुसार तळ्यातील गाळ स्वतःच्या वाहनाने व मजुरांच्या सहाय्याने कारखान्याचे अधिकारी सांगतील त्या ठिकाणी टाकणे बंधनकारक होते.
मात्र, ३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास संबंधित ठेकेदाराने कारखान्याची पूर्वपरवानगी न घेता आणि देखरेखीसाठी नियुक्त कर्मचारी रामदास बापू चव्हाण यांच्या संगनमताने अनट्रीटेड तळ्यात पाणी सोडून गाळ पातळ केला. त्यानंतर पंपाच्या साहाय्याने हा गाळमिश्रित द्रव तळ्याबाहेर सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उताराच्या दिशेने वाहून गेलेल्या या गाळमिश्रित पाण्यामुळे नदीकाठचा परिसर प्रदूषित झाल्याचे कारखाना प्रशासनाच्या निदर्शनास आले. या प्रकरणी पारगाव कारखाना पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
“कारखाना प्रशासनाच्या तक्रारीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरील परिस्थिती, कागदपत्रे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सखोल तपास सुरू असून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल.”
– सचिन कांडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पारगाव.





