Onion Price Hike: कांद्याचे दर थेट पन्नास पार! ग्राहकांचे बजेट कोलमडले, पण शेतकऱ्यांना फायदा होतोय का?
Onion Price Hike: बाजार समित्यांमध्ये आवक घटल्याने कांद्याचे भाव ४३०० रुपये प्रतिक्विंटलवर; मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे दरात तेजी.

– नीलकंठ मोहिते
Onion Price Hike – गेल्या वर्षभरापासून कवडीमोल दराचा सामना करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर बाजारभावातील तेजीने काहीसा दिलासा मिळू लागला आहे. बाजारातील कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याने मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाली असून, विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर ३२०० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.
मात्र, बाजारभावातील या तेजीचा सर्वच कांदा उत्पादकांना समान फायदा मिळत नसल्याचे वास्तव आहे. छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची पुरेशी व्यवस्था नसल्याने दर कमी असताना कांदा विकावा लागतो. त्यामुळे दरवाढ झाली असली तरी अनेक शेतकरी या तेजीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील निमगाव केतकी, काठी तसेच बावडा परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला होता. उत्पादनाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले होते. त्यातच त्या काळात कांद्याला केवळ पाच ते आठ रुपये किलो दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले होते. कमी दर, वाढता उत्पादन खर्च आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकाचे क्षेत्र कमी केले.
परिणामी यंदा बाजारातील आवक घटली असून त्याचा थेट परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे. विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कमी खर्चातील सामुदायिक कांदा चाळी, आधुनिक साठवणूक केंद्रे, बाजारभावाची पारदर्शक माहिती आणि उत्पादन खर्चावर आधारित दराची प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज आहे.
कांदा उत्पादक धनंजय गोसावी (रेडा, शहाजीनगर) म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी कांद्याला पाच-सात रुपये किलो दर मिळत होता. त्यावेळी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आज त्याच कांद्यासाठी ग्राहकांना पन्नास रुपये मोजावे लागत आहेत. शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही या परिस्थितीचा फटका बसत आहे. कांद्याला स्थिर दर मिळण्यासाठी सरकारने उत्पादन खर्च, साठवणूक आणि बाजारपेठ यांचा समन्वय साधणारे धोरण तयार करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याचा कांदा स्वस्त; ग्राहकांना मात्र महाग
कांद्याच्या सध्याच्या दराने शेतीमालाच्या बाजारव्यवस्थेतील मोठा विरोधाभास पुन्हा समोर आणला आहे. ज्या कांद्याला काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांना पाच-सात रुपये किलो दर मिळत होता, तोच कांदा आता ग्राहकांना ५० रुपये किलोने खरेदी करावा लागत आहे. कांदा साठवून ठेवण्यासाठी चाळ,गोदाम अथवा आधुनिक साठवणूक सुविधा नसल्याने छोट्या शेतकऱ्यांना काढणीनंतर लगेच माल बाजारात आणावा लागतो.






