Onion Express : कांदा दरवाढ रोखण्यासाठी सरकारची मोठी योजना; ‘कांदा एक्सप्रेस’मधून पुरवठा सुरू, 35 रु. किलोने मिळणार
Onion Express : कांद्याच्या दरात 59 टक्क्यांची वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने ‘कांदा एक्सप्रेस’ सुरू केली. नाशिकमधून पाच शहरांना कांदा पाठवला जाणार असून 35 रुपये किलोने विक्री होणार आहे.

Onion Express : कांद्याच्या वाढत्या दराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नाशिक येथील बफर स्टॉकमधील कांदा रेल्वेच्या विशेष रेकद्वारे देशातील प्रमुख शहरांमध्ये पाठवण्यास सुरुवात केली आहे. ‘कांदा एक्सप्रेस’च्या माध्यमातून पाठवला जाणारा साठा बुधवारपर्यंत संबंधित केंद्रांवर पोहोचण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी सोमवारी दिली.
कांद्याच्या दरात 59 टक्के वाढ –
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 24 ऑगस्ट रोजी देशातील कांद्याचा सरासरी किरकोळ दर 43.53 रुपये किलोवर पोहोचला. वर्षभरापूर्वी तो 27.37 रुपये किलो होता. म्हणजेच किरकोळ दरात तब्बल 59 टक्क्यांची वाढ झाली आहे. घाऊक दरही 68 टक्क्यांनी वाढून 35.58 रुपये किलो झाला आहे. वर्षभरापूर्वी हा दर 21.23 रुपये किलो होता.
प्रमुख शहरांमध्येही कांदा महागला आहे. चेन्नईत 60 रुपये, दिल्लीत 55 रुपये, तर कोलकात्यात 53 रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे.
पाच शहरांमध्ये सुरुवातीला पुरवठा –
‘कांदा एक्सप्रेस’च्या माध्यमातून सुरुवातीला चेन्नई, मदुराई, दिल्ली, एर्नाकुलम आणि गुवाहाटी या पाच प्रमुख बाजारपेठांमध्ये कांदा पाठवला जाणार आहे. बाजारातील गरजेनुसार पुढील काळात आणखी शहरांचा समावेश केला जाणार आहे.
नाशिकमधील कांदा बफर स्टॉकमधून मोठ्या प्रमाणात कांदा रेल्वे रेकद्वारे पाठवला जात असून, निवडक शहरांमधील घाऊक तसेच किरकोळ बाजारात त्याची विक्री केली जाणार आहे. NCCF आणि NAFEDच्या माध्यमातून किरकोळ बाजारात कांदा 35 रुपये किलो दराने उपलब्ध करून दिला जाणार आहे.
निधी खरे यांनी सांगितले की, सरकार कांद्याच्या दरांवर बारकाईने लक्ष ठेवून असून, गरज भासल्यास आणखी उपाययोजना केल्या जातील. नाशिकच्या मंडईतील कांद्याचे दर दिल्लीपेक्षा जास्त असणे अपेक्षित नसल्याचे सांगत त्यांनी बाजारातील कार्टेलायझेशन आणि सट्टेबाजीची शक्यता व्यक्त केली.
सरकारकडे 1.21 लाख टन कांदा बफर स्टॉक –
कांदा बफर स्टॉक हा दरवाढीच्या काळात बाजारात पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून ठेवला जाणारा धोरणात्मक साठा आहे. NAFED आणि NCCFसारख्या संस्थांमार्फत किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत कांद्याची खरेदी केली जाते आणि दर वाढल्यास नियोजनबद्ध पद्धतीने बाजारात साठा उतरवला जातो.
चालू वर्षासाठी सरकारकडे 1.21 लाख टन कांद्याचा बफर स्टॉक उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी काळातील देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
कांद्याचा पुरवठा पुरेसा; उत्पादन 307.37 लाख टन –
2025-26 मध्ये देशातील कांदा उत्पादन 307.37 लाख टन राहण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी हे उत्पादन 307.67 लाख टन होते. म्हणजेच यंदाचे उत्पादन जवळपास मागील वर्षाइतकेच आहे.
सरकारच्या मते, उत्पादन स्थिर राहणे, बफर स्टॉक उपलब्ध असणे आणि बाजारात वेळोवेळी हस्तक्षेप केल्यामुळे कांद्याच्या हंगामी दरवाढीवर नियंत्रण मिळवता येईल. शेतकरी आणि ग्राहक या दोघांचे हित लक्षात घेऊन किंमत स्थिरीकरणाचे धोरण राबवले जात आहे.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कांदा का महागतो?
दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कांद्याच्या दरात वाढ होण्याची प्रवृत्ती दिसते. सणासुदीतील वाढती मागणी, हवामानातील बदल, पुरवठा साखळीतील अडथळे आणि मागणीतील चढ-उतार यामुळे कांद्याच्या दरात हंगामी अस्थिरता निर्माण होते.
ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार बफर स्टॉकमधील कांदा घाऊक मंडईत मोठ्या प्रमाणात तसेच निवडक शहरांमध्ये किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध करून देते. दर आणि बाजारातील परिस्थितीचा सतत आढावा घेऊन कांद्याचा साठा कुठे, किती आणि कधी सोडायचा, याचा निर्णय घेतला जातो.
‘कांदा एक्सप्रेस’चा विस्तार –
मोठ्या प्रमाणात कांद्याची वाहतूक अधिक कार्यक्षम करण्यासाठी ‘कांदा एक्सप्रेस’ उपक्रम 2024-25 मध्ये सुरू करण्यात आला. पहिल्या वर्षी 14 रेल्वे रेकद्वारे सुमारे 12 हजार टन कांदा पाच शहरांमध्ये पाठवण्यात आला.
2025-26 मध्ये या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. 86 रेल्वे रेकद्वारे सुमारे 88 हजार टन कांदा देशातील 16 प्रमुख शहरांमध्ये पाठवण्यात आला. आता वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा या माध्यमातून कांद्याचा पुरवठा वाढवण्यात येत आहे.





