मुंबई – जागतिक स्तरावर लोकप्रियता व अस्तित्व टीकवून ठेवायचे असेल तर येत्या काळात एकदिवसीय क्रिकेटचे सामने 40 षटकांचे केले पाहिजेत. टी-20 क्रिकेटच्या वेगामुळे एकदिवसीय क्रिकेट कालबाह्य होण्याचा धोका आहे त्यामुळेच असे काही बदल सर्वमान्य झाले तरच हे क्रिकेट टीकेल, असे मत भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू व समालोचक रवी शास्त्री यांनी मांडले आहे.
यंदाची एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा भारतात येत्या काळात होत आहे. याच स्पर्धेपासून जर ही अभिनव कल्पना प्रायोगिक तत्वावर राबवली गेली तर त्याचा नफा-तोटा समजून येइल व ही कल्पनाही किती योग्य आहे ते देखिल लक्षात येइल. आयसीसीने याबाबत गांभीर्याने विचार केला पाहीजे अन्यथा जी स्थिती आज कसोटी सामन्यांची झालेली दिसते तीच एकदिवसीय सामन्यांची होणार आहे, असा धोकाही शास्त्री यांनी व्यक्त केला.
एकदिवसीय क्रिकेटला प्रारंभ झाला तेव्हा हे सामने 60 षटकांचे होत होते. त्यात 1987 सालापासून बदल झाला व सामने प्रत्येकी 50 षटकांचे होऊ लागले. त्यानंतर 2000 साली टी-20 क्रिकेटचा जन्म झाला व लवकरच त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही झाले. हे सामने चार तासांतच संपतात त्यामुळे प्रेक्षकांमध्येही त्याची लोकप्रीयता वाढली. त्यामुळे येत्या काळात जर एकदिवसीय क्रिकेट प्रत्येकी 40 षटकांचे केले गेले तर त्यातही वेग येइल व चाहत्यांना हा बदलही रुचेल, असेही ते म्हणाले.
मधल्या पंचवीस षटकांमुळे विरस
एकदिवसीय क्रिकेट कंटाळवाणे होण्याचे आणखी एक कारण आहे. पहिली 15 षटके आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. त्यानंतर अखेरच्या 10 षटकांत फलंदाज चौकार व षटकारांची बरसात करताना दिसतात. मात्र, यातील मधील जी 25 षटके असतात ती विकेट सुरक्षित ठेवण्यासाठीच संथपणे धावा घेत खेळली जातात. याच संथपणामुळे लोकांमध्येच नव्हे तर खेळाडूंमध्येही टी-20 क्रिकेट जास्त पसंत केले जाते. जर सामने 40 षटकांचे खेळले गेले तर त्यात वेग येइल व हे क्रिकेट चिरकाल टीकेल, असे मतही शास्त्री यांनी मांडले.
कसोटी क्रिकेट राहिलेच पाहीजे
कसोटी क्रिकेट हाच खरा क्रिकेटचा गाभा आहे. यातूनच फलंदाजाचे तंत्र, जिद्द, संयम याची खरी कसोटी लागते म्हणूनच या क्रिकेटला कसोटी असे म्हणतात. पण मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमुळे याची लोकप्रीयता कमी झाली आहे. ती कायम राहावी यासाठी जे काही करणे गरजेचे आहे ते केले जावे. कसोटी क्रिकेट तगले नव्हे तर गाजलेच पाहीजे. स्पोर्टी खेळपट्ट्या, हिरवीगार मैदाने, प्रेक्षकांसाठी खास सुविधा तसेच शाळा व महाविद्यालयीन तसेच नवोदित खेळाडूंसाठी मोफत प्रवेश असेही काही उपाय करुन पाहायला हरकत नाही, असा सल्लाही शास्त्री यांनी दिला.