महिलांच्या आयपीएल स्पर्धेत रविवारी मुंबई इंडियन्सने युपी वॉरियर्सचा पराभव केला. हा केवळ एका संघाने दुसऱ्या संघाचा केलेला पराभव नव्हता तर एका महान खेळाडूने आपल्या प्रत्येक योजनेला यशस्वी सिद्ध करुन प्रतिपक्षावर नियोजनबद्धतेने केलेली मात होती. ही महानतेच्या वाटेवर प्रवास करत असेलेली खेळाडू आहे भारतीय संघाची व मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर.
युपीने विजयासाठी दिलेल्या धावांचा यशस्वी पाठलाग करताना कोणताही धोका न पत्करता आपल्या खेळावर प्रचंड विश्वास टेवून हरमनने आपली खेळी रचली. हे काम पुरुष संघात पूर्वी महेंद्रसिंह धोनी करत असे. सामन्याची परिस्थिती कशीही असो आपला संयम सोडायचा नाही व योग्य पद्धतीने वाटचाल करत आपले ध्येय गाठायचे हे गुण संपूर्ण महिला संघात केवळ हरमनप्रीतकडेच असल्याची साक्षही मिळाली.
स्मृती मानधनाला नॅशनल क्रश व स्टार फलंदाज असे संबोधले जाते ते चाहत्यांकडून पण स्मृतीच्याच लोकप्रीयतेमुळे झाकोळल्या जात असलेल्या हरमनमधील महान खेळाडू कोणत्याही प्रशिक्षकाला दिसली नाही याचे वाईट वाटते. हरमनने युपीविरुद्ध नाबाद 53 धावांची केलेली खेळी पाहिल्यावर असे दिसत होते की तीच्याकडे प्रत्येक चेंडूवर विचार करुन फटका मारण्यासाठी वेळ होता जणू काही ती डगआऊटमधूनच सेट होऊन आली आहे.
समोरून प्रमुख फलंदाज बाद होत असतानाही तिने शांतपणे केलेली खेळी निश्चितच कौतुकास्पद आहे. पण तरीही माध्यमांच्या चर्चेत स्मृती मानधनाच राहणार यात शंका नाही. सचिन तेंडुलकर महान आहेच परंतू त्याच्या छायेत राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मणसारखे अनेक फलंदाज झाकोळले गेले हेच प्रकार हरमनच्या बाबतीततही लागू पडतो.
ICC World Test Championship : भारताचा आता ऑस्ट्रेलियाशी #WTC23 अंतिम सामना
या महिलांच्या आयपीएल स्पर्धेत हरमनच्याच नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सलग चार सामने जिंकले व त्यात हरमनने दोन अर्धशतके फटकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा घेतला. मात्र, ज्या पद्धतीने तिच्या कतृत्वाची दखल घेतली गेली पाहीजे ती दिसत नाही. मात्र, येत्या काळात मिताली राज व अंजूम चोप्रा यांच्या गुणवत्तेचे मिश्रण असलेली हरमन जागतिक किर्ती संपादन करेल यात शंका नाही.