लातूर – आज भारतासह विदेशातही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे. हिंदूंसह मुस्लीम बांधवही हा उत्सव साजरा करताना पाहायला मिळतात. मात्र अशातच भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. त्यांच्या लातूरातील एका भाषणाची व्हिडीओ क्लिपही व्हायरल होत असून त्यांच्या वक्तव्याचा सोशल मीडियावर निषेध करण्यात येत आहे. तसेच दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भाजप नेत्यांना सूचना केल्या होत्या की कोणीही देव, धर्माबद्दल वक्तव्य करू नयेत, मात्र आमदारांनी शहा यांच्या सूचनांनाही केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे.
आमदार टी राजा सिंह यांनी लातूरात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर संकल्प प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दुचाकी रॅलीला त्यांनी संबोधित केले. यावेळी टी राजा सिंह म्हणाले की, “हिंदू आणि मुस्लिम कधीच भाऊ-भाऊ होऊ शकत नाहीत. शिवाजी महाराज आणि औरंगजेब हे भाऊ भाऊ-होऊ शकतात का? महाराणा प्रताप आणि अकबर भाऊ-भाऊ होऊ शकतात का? गाईची पूजा करणारा आणि गाईची हत्या करणारे भाऊ-भाऊ होऊ शकतात का? वंदे मातरम गाणारा आणि वंदे मातरम गाण्यास विरोध करणारा भाऊ-भाऊ होऊ शकतात का? असं वक्तव्य भाजप आमदार टी राजा सिहं यांनी केलं आहे.
दरम्यान, टी. राजा सिंह यांचे भाषण व्हायरल होत आहे. दरम्यान सिंह यांना चिथावणीखोर भाषण न करण्यासंदर्भात प्रशासनाकडून बजावण्यात आलं होत. तरीदेखील त्यांनी प्रशासनाच्या सूचना न जुमानता प्रक्षोभक भाषण केले आहे. टी. राजा सिंह यांच्या या चिथावणीखोर भाषणामुळे हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. धर्मनिरपेक्ष देशात टी राजा सिंह यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे बोलले जात आहे. भाजपने आता धर्माच्या नावावर, हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करून मतांची पोळी भाजण्याचे काम बंद करावे अशी टीका विरोधक करत आहेत.