प्रभात वृत्तसेवा पुणे – मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या सात कि.मी. तीव्र उतारावर अवजड वाहनांचे नियंत्रण सुटून होणारे अपघात रोखण्यासाठी अवजड वाहनांची वेगमर्यादा प्रतितास ६० वरून ४० कि.मी. करण्यात आली. परंतु, अवजड वाहन चालकांकडून ही मर्यादा धुडकावली जात आहे. याच कारणातून नवले पूल परिसरात गेल्या पाच वर्षांत ९५ प्राणांतिक अपघात झाले आहेत. या अपघातात आतपर्यंत ११५ जणांचा मृत्यू झाला आहे, ७२ गंभीर अपघातात ९४ जण जखमी झाले आहेत, याबरोबरच प्राणांतिक, गंभीर, ९० किरकोळ असे एकूण मिळून २५७ अपघात झाले आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.नवले पुलावर गुरुवारी (१३ नोव्हेंबर) भीषण दुर्घटना घडली. साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने सलग १० ते १२ वाहनांना जबर धडक दिली. भीषण अपघातात वाहनांना आग लागली आणि आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. १५ ते १६ जण गंभीर जखमी झाले. नवले पूल परिसरात अशा स्वरूपाचे अपघात यापूर्वीही घडले आहेत. सात कि.मी.चा हा तीव्र उतार असल्याने अवजड वाहनांचे ब्रेक निकामी होणे किंवा वाहनाचे नियंत्रण सुटणे, हे प्रकार समोर आले आहेत. यावर उपाय म्हणून वेगमर्यादा कमी करणे, चेतावणी फलक लावणे, लेन-डिसिप्लिनचे नियम तसेच विशेष लक्ष ठेवण्यासाठी गस्त वाढवणे अशा उपाय योजना सुरू करण्यात आल्या. तरीही अवजड वाहनचालकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे गुरूवारी झालेल्या अपघातून समोर आले आहे. यामुळे या मार्गाच्या दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी अधिक सक्षम उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरली आहे.