Nagpur News : आकांक्षाच्या मृत्यूचं गूढ गडद! प्रकरणाला मिळालं नवं वळण; धक्कादायक माहिती समोर
Nagpur News : सुरुवातीला आत्महत्येपूर्वी तिने सुसाईड नोट लिहिल्याची चर्चा होती. मात्र, अंबाझरी पोलिसांनी अनेक दिवस अशी कोणतीही चिठ्ठी आपल्या ताब्यात नसल्याचे सांगितले होते.

Nagpur News : देशभरात चर्चेत राहिलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित नागपूरमधील १९ वर्षीय विद्यार्थिनी आकांक्षा चतुर्वेदीच्या आत्महत्येला आता नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. आत्महत्येनंतर सापडलेल्या कथित सुसाईड नोटवरून नागपूर पोलिसांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
आकांक्षाने २० मे रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला आत्महत्येपूर्वी तिने सुसाईड नोट लिहिल्याची चर्चा होती. मात्र, अंबाझरी पोलिसांनी अनेक दिवस अशी कोणतीही चिठ्ठी आपल्या ताब्यात नसल्याचे सांगितले होते. कुटुंबीयांकडे सुसाईड नोट असल्यास ती पोलिसांकडे सुपूर्द करावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले होते.
मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार ही सुसाईड नोट घटनेच्या पहिल्याच दिवसापासून तपास अधिकाऱ्यांकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या नोटची नोंद स्टेशन डायरी किंवा आत्महत्येशी संबंधित अधिकृत कागदपत्रांमध्ये करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत संबंधित तपास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, आकांक्षाच्या नातेवाईकांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आत्महत्येनंतर त्याच दिवशी घरात सुसाईड नोट सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, मुलीच्या मृत्यूमुळे हादरलेल्या कुटुंबीयांनी ती नोट तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन केली नव्हती, असेही व्हिडिओमध्ये सांगितले गेले आहे. त्यामुळे आकांक्षाच्या मृत्यूचं गूढ वाढले असल्याची चर्चा आहे.
आकांक्षाच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलयं?
सुसाईड नोटमध्ये आकांक्षाने आई-वडिलांची माफी मागत फेरपरीक्षेच्या दबावामुळे मानसिक तणावात असल्याचे नमूद केले होते. “पुन्हा NEET परीक्षा देऊन चांगले गुण मिळतील याची खात्री नाही,” असे तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते.
पेपरफुटी प्रकरणानंतर घेतल्या जाणाऱ्या फेरपरीक्षेच्या निर्णयामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब नोंदवले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण झाला आहे की, २० मे रोजी घटना घडूनही सुसाईड नोट अनेक दिवस सार्वजनिक का झाली नाही? ती पोलिसांकडे आधीपासून होती का, की कुटुंबीयांनी उशिरा दिली? या प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित असून प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणती नवी माहिती समोर येते याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.





