Beed News : बायकोची ‘ती’ डायरी वाचली अन् तलाठी पतीने मृत्यूला कवटाळलं; बीड हळहळलं, नेमकं काय घडलं?
Beed News : 13 मे 2026 रोजी त्याचा विवाह बीड येथील एका तरुणीसोबत झाला होता. संबंधित तरुणीही शासकीय सेवेत कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.

Beed News : बीड जिल्ह्यात समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत चंद्रपूर येथे कार्यरत असलेले तलाठी गणेश दत्तू कोळी (वय 26) यांनी अंबाजोगाई येथे गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात मृत तरुणाच्या आईच्या जबाबावरून पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यातील नांदुर्गा (ता. औसा) येथील अंगणवाडी सेविका सुनंदा कोळी यांचा मुलगा गणेश कोळी याची कारकीर्द संघर्षमय होती. 2021 मध्ये तो राज्य राखीव पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून रुजू झाला होता. त्यानंतर स्पर्धा परीक्षेत यश मिळवत 2024 मध्ये चंद्रपूर येथे तलाठी पदावर नियुक्ती झाली. 13 मे 2026 रोजी त्याचा विवाह बीड येथील एका तरुणीसोबत झाला होता. संबंधित तरुणीही शासकीय सेवेत कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. (Beed News )
लग्नानंतर नवदांपत्य कर्नाटक येथे देवदर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात पत्नीला आलेल्या एका फोनवरून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. 18 मे रोजी घरी सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर गणेश अधिकच चिंतेत आणि नाराज दिसत होता. त्यानंतर पत्नी माहेरी बीडला निघून गेली. (Beed News)
दरम्यान, 25 मे रोजी सकाळी गणेशने आपल्या बहिणीला फोन करून मनातील वेदना व्यक्त केल्या. पत्नीचे दुसऱ्या युवकासोबत प्रेमसंबंध असून त्याबाबतची नोंद पत्नीच्या डायरीत वाचल्याचे त्याने सांगितले. यावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाल्याचेही त्याने बहिणीला सांगितले. या संभाषणानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. (Beed News )

Beed News : बायकोची ‘ती’ डायरी वाचली अन् तलाठी पतीने मृत्यूला कवटाळलं; बीड हळहळलं, नेमकं काय घडलं?
याच दिवशी दुपारी अंबाजोगाई येथील पत्नी राहत असलेल्या खोलीत गणेशने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. घटनेनंतर दोन दिवसांनी सासरच्या मंडळींनी सुनेशी संपर्क साधला असता, “माझे लग्न माझ्या इच्छेविरुद्ध लावण्यात आले. मला गणेशसोबत राहायचे नाही,” असे तिने स्पष्टपणे सांगितल्याचा दावा मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
तसेच, पत्नी सतत फोन लॉक ठेवून कोणाशीतरी संवाद साधत असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, पत्नीने वारंवार फोन करून गणेशला अंबाजोगाईला बोलावले होते. त्यानुसार 24 मे रोजी तो तिची भेट घेण्यासाठी तिच्या राहत्या खोलीवर गेला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी अंबाजोगाई पोलिस ठाण्यात 4 जून रोजी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या प्रकरणाचा पोलिस पुढील तपास करत आहेत. (Beed News )





