Mutha River: महिनाभरपासून मुठा खळखळतेय! आतापर्यंत खडकवासला साखळीत ‘इतके’ टक्के पाणीसाठा जमा
Mutha River: २४ जुलैपासून सुरू असलेला विसर्ग अद्यापही कायम; आतापर्यंत १८.३८ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडल्याने पुणेकरांची पाण्याचा प्रश्न मिटला.

Mutha River – राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असली तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे यंदा गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच मुठा नदीत सलग महिनाभरापासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातून आतापर्यंत तब्बल १८.३८ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे.
दरम्यान, खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये मिळून २९.१३ टीएमसी म्हणजेच ९९.९४ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या अनेक वर्षात नदीतून सुरू असलेला विसर्ग जास्तीत जास्त ८ ते १० दिवसांपर्यंतचा आहे. यंदाच्या पावसाळ्यात खडकवासला धरणातून ७ जुलै रोजी प्रथम विसर्ग सुरू करण्यात आला होता. हा विसर्ग तीन दिवस सुरू राहिला.
या कालावधीत सुमारे १.८० टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. त्यानंतर २४ जुलैपासून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला. तेव्हापासून महिनाभरापासून नदीपात्रात सातत्याने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. पाटबंधारे विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी खडकवासला धरणात १.९७ टीएमसी म्हणजे १०० टक्के, पानशेतमध्ये १०.६५ टीएमसी म्हणजे १०० टक्के,
वरसगावमध्ये १२.८२ टीएमसी म्हणजे १०० टक्के, तर टेमघरमध्ये ३.६९ टीएमसी म्हणजे ९९.५५ टक्के पाणीसाठा आहे. चारही धरणांमध्ये सध्या एकूण २९.१३ टीएमसी पाणी असून, मागील वर्षी याच कालावधीत हा साठा २८.३९ टीएमसी म्हणजे ९७.४१ टक्के होता. शनिवारी चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून एकूण ४८१ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे.
मात्र, ही पाण्याची वाढ सातत्याने होत असल्याने धरणातून मुठा नदीत ४००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणे जवळपास पूर्ण भरलेली असल्याने आवक आणि साठ्याचा समतोल राखण्यासाठी खडकवासला धरणातून विसर्ग कायम ठेवला आहे. त्यामुळे मुठा नदीत महिनाभरापासून सुरू असलेला पाण्याचा खळखळाट अद्यापही कायम आहे.






