MLA Babaji Kale: अधिवेशन संपताच आमदार बाबाजी काळे फिल्डवर! खेड तालुक्यातील पूरग्रस्त भागाची केली प्रत्यक्ष पाहणी
MLA Babaji Kale: पंचनामे वेळेत पूर्ण करून नुकसानभरपाई द्या, बाधित नागरिकांसाठी अन्नधान्य आणि चाऱ्याची त्वरित व्यवस्था करा - आमदार बाबाजी काळे.

MLA Babaji Kale – खेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे, रस्ते, कालवे, पूल आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विधानसभा अधिवेशन संपताच खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी रविवारी (दि. 12) पूरग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानग्रस्त नागरिकांची भेट घेतली तसेच प्रशासनाला तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या. आमदार काळे यांनी पाईट, औदर, खरपुडी, राजगुरुनगर, सातकर परिसरासह विविध गावांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.
पाईट आणि औदर येथील पाझर तलाव फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याला सातकर परिसरात भगदाड पडल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती त्यांनी अधिकार्यांकडून घेतली. खरपुडी येथे भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्याचे ढापे वेळेत न उचलल्यामुळे उभी पिके आणि सुपीक शेती वाहून गेल्याचे त्यांनी पाहिले. तसेच राजगुरुनगर-तिन्हेवाडी मार्गावरील रस्त्यालगतची विहीर खचल्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून वाहतूक बंद असल्याची पाहणीही त्यांनी केली.
अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, पुलांचे भराव वाहून जाणे तसेच पुणे-नाशिक महामार्गासह विविध रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचेही निदर्शनास आले. पूरग्रस्त शेतकरी व नागरिकांशी संवाद साधताना आमदार बाबाजी काळे म्हणाले, खेड तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून नुकसानभरपाई तातडीने द्यावी.
रस्ते, पूल, कालवे आणि इतर सार्वजनिक सुविधांची दुरुस्तीही तातडीने करण्यात यावी. तसेच बाधित नागरिकांसाठी निवारा, अन्नधान्य आणि पशुधनासाठी चार्याची त्वरित व्यवस्था करावी. या पाहणी दौर्यात पंचायत समितीचे उपसभापती मंगेश सावंत, माणिक भोगाडे, माजी सरपंच मारुती सातकर, संतोष राक्षे, प्रकाश सातपुते, राजेंद्र थिगळे, राजगुरुनगर नगरपरिषदेच्या नगरसेविका श्वेता सोमनाथ ढोले तसेच सार्वजनिक बांधकाम, कृषी, महसूल विभाग आणि चासकमान धरण प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.
“अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावे संकटात सापडली आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करून पूरग्रस्तांना तातडीचा दिलासा देणे ही काळाची गरज आहे.”
– दीप्ती भोगाडे, जिल्हा परिषद सदस्या





