उदगीर येथे भरलेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले. हे संमेलन येत्या काही काळ संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या अध्यक्षीय भाषणामुळे गाजेल.
22 एप्रिल रोजी सासणे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि अध्यक्षपदावरून जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी आजच्या काळाचे वर्णन करताना “भ्रमयुग’ असा शब्द वापरला. त्यांच्या भाषणातील काही वाक्यं उद्धृत करणे गरजेचे आहे. ते भाषणात म्हणाले, “आपण अशा छद्मबुद्धी विध्वसंकाच्या ताब्यात जात आहोत. असे संकेत मिळायला लागले आहेत. चिंतनशील लेखकाला अशावेळेस चिंता वाटत असते, वाटली पाहिजे’, सासणेंची चिंता रास्त आहे. याबद्दल त्यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून आवाज उठवला, याबद्दल त्यांचे खास अभिनंदन.
प्रत्येक समाजातील लेखक/कलावंतांवर एक खास जबाबदारी असते. ती जबाबदारी म्हणजे त्यांनी कोणाचीही आणि कशाचीही तमा न बाळगता सत्यकथन केले पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांच्या डोळ्याला डोळा भिडवत जाब विचारला पाहिजे. मी येथे जाणीवपूर्वक “कोणत्याही सत्ताधाऱ्याला’ असा शब्द वापरला आहे. याचा अर्थ असा की, सत्ताधारी कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही राजकीय तत्त्वज्ञानाचे पाईक असो, सर्वांना सत्तेचे केंद्रीकरण करायला आवडते. त्याचप्रमाणे त्यांना आविष्कार स्वातंत्र्यावर बंधनं घालायला आवडतात. हे समजून घेण्यासाठी आपल्याला विसाव्या शतकातील जगाच्या इतिहासावर नजर टाकावी लागते.
ही चर्चा सुरू करण्याअगोदर विसाव्या शतकात सुरू झालेली राजकीय तत्त्वज्ञानाची लढाई समजून घेतली पाहिजे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेल्या कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानाने जगाच्या इतिहासाला नवे वळण लागले. मार्क्सवादाने जगाची आर्थिक पुनर्रचना करण्याचे स्वप्न बघितले. श्रमजीवी वर्ग निर्माण करत असलेल्या संपत्तीचं न्याय्य वाटप झालं पाहिजे, अशी मागणी करत “जगातल्या कामगारांनो, एक व्हा’, असे आगळेवेगळे आवाहन केले. यातून प्रेरणा घेऊन लेनिनने झारशाहीखाली असलेल्या रशियात ऑक्टोबर 1917 मध्ये कामगार क्रांती केली.
पुढे या क्रांतीने स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि अवकाश संशोधनात अभूतपूर्व प्रगती करून दाखवली. त्यामुळे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स वगैरे भांडवलशाही देशांचे धाबे दणाणले. या प्रगतीसाठी स्टॅलिनने आणि नंतर चीनमध्ये माओने लाखो निरपराध शेतकऱ्यांचा बळी दिला वगैरे आरोप व्हायला लागले. सर्वांगीण प्रगती साधत असताना स्टॅलिनने तसेच माओने राजकीय सत्तेचे केंद्रीकरण केले. या केंद्रीकरणाच्या आणि त्यातून होत असलेल्या अन्याय/अत्याचारांच्या विरोधात, आविष्कार स्वातंत्र्याच्या झालेल्या संकोचाच्या विरोधात तेथील सोल्झेनित्सीन, बोरीस पास्तरनॅक सारख्या लेखक/कलाकारांनी आवाज उठवला होता.
रशियात हे सर्व घडत असताना अमेरिकेतील राज्यकर्ते आनंदात होते. मार्क्सवादाची परस्पर बदनामी होताना पाहून भांडवलशाही देशांतील सत्ताधारी वर्गाला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. दुसरे महायुद्ध 1945 साली संपले आणि त्यानंतर लवकरच अमेरिकेत सिनेटर मॅकार्थी युग सुरू झाले. सिनेटर जोसेफ मॅकार्थींच्या (1908 नेतृत्वाखाली अमेरिकेतील कॉंग्रेसने (म्हणजे आपल्याकडील संसद) एक समिती गठीत केली आणि कम्युनिस्टांबद्दल आपुलकी वाटणाऱ्या लेखक/कलावंतांना त्रास द्यायला सुरुवात केली. मकार्थी यांनी फेब्रुवारी 1950 मध्ये एका भाषणात असे नमूद केले होते की, त्यांच्याजवळ अशा लेखक/कलावंतांची यादी आहे, ज्यांना कम्युनिझमबद्दल प्रेम वाटते. यानंतर त्यांनी असे आरोप केले की हे कम्युनिस्ट आता अमेरिकन सरकारच्या अनेक विभागात शिरले आहेत आणि आतून अमेरिकन सरकारचे धोरण कम्युनिझमला पोषक कसे होईल, यासाठी प्रयत्न करत असतात. मॅकार्थीने त्रास दिलेल्यांत आर्थर मिलर, चार्ली चॅप्लीन यांच्यासारखे कलाकार, लेखक होते.
या संदर्भात दोन घटनांची नोंद घेतली पाहिजे. 1949 साली सोव्हिएत युनियनने अणुबॉम्ब स्फोट केला आणि या क्षेत्रातील अमेरिकेची एकाधिकारशाही मोडून काढली. त्याचप्रमाणे 1949 साली माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. या दोन घटनांमुळे जगभर कम्युनिस्ट आक्रमक झाले होते.परिणामी हॉलीवूडमधील अनेक चित्रपट निर्मात्यांनी “आम्ही कम्युनिस्ट विचारांच्या नट-नटींना काम देणार नाही’ असे जाहीर केले. यामुळे जगभर अमेरिकेची बदनामी झाली. स्टॅलिन किंवा माओच्या दडपशाहीबद्दल हिरीरीने बोलणारे लेखक/कलावंत अमेरिकेतील मॅकार्थी प्रकरणाबद्दल एक शब्द उच्चारायला तयार नव्हते. येथे अनेक लेखकांचे पितळ उघडे पडले.
असा प्रकार 1975 ते 1977 आपल्या देशात लागू करण्यात आलेल्या अंतर्गत आणीबाणीच्या काळात घडला. आणीबाणी सुरू असताना अनेक लेखक/कलावंतांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता किंवा मूग गिळून गप्प राहणे पसंद केले होते. हेच गप्प बसलेले लेखक आणीबाणी उठल्यानंतर केंद्र सरकारवर कडक शब्दांत टीका करायला लागले होते. यातील दुटप्पी मानसिकता उघड आहे.
असा दुटप्पीपणा जातिवंत कलाकाराचे लक्षण नाही. जातिवंत कलाकार नेहमी सत्याच्या बाजूने आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूने उभा राहतो. सत्तेत कोणता पक्ष आहे, कोणते राजकीय तत्त्वज्ञान आज सत्तेच्या जागी विराजमान झालेले आहे, याकडे नजर ठेवत सच्चा लेखक कलावंत आपली भूमिका ठरवत नाही.
या संमेलनात इतरत्र झालेल्या काही भाषणांचासुद्धा परामर्श घेणे गरजेचे आहे. खासकरून त्यातील महत्त्वाची काही वाक्यं जी महत्त्वाच्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली आहेत. गोव्याचे ज्येष्ठ लेखक दामोदर मावजो म्हणाले, “सत्तेला माज चढला की, साहित्यावर निर्बंध लादले जातात’. हे अर्थसत्य आहे. जागतिक साहित्याचा विचार केला तर असे दिसते की, बंदी लादण्याची कारणे अनेक आणि वेगवेगळी असू शकतात. उदाहरणार्थ, 1928 साली इंग्लंडने डी. एच. लॉरेन्सच्या “लेडी चॅटर्लीज लव्हर’ या कादंबरीवर बंदी घातली होती. लॉरेन्सच्या कादंबरीत संभोगाची वर्णन अश्लील स्वरूपाची आहेत, असा आक्षेप होता. या बंदीत सत्ताधाऱ्यांचा माज कोठे दिसून येतो? तसेच भारताने 1988 साली सलमान रश्दीच्या “सॅटनिक व्हर्सेस’ वर बंदी घातली होती. याचे कारण या कादंबरीमुळे भारतात हिंदू-मुस्लीम दंगे भडकतील, असे राजीव गांधी सरकारला वाटले होते. यात सत्ताधाऱ्यांचा माज कोठे दिसतो?
या संमेलनात “लेखक आणि लोकशाही मूल्ये’ या परिसंवादात बोलताना राजकुमार तांगडे म्हणाले, “कोणाच्यातरी चरणी साहित्य अर्पण करणारे पोटार्थी लेखक कसली मूल्यं जपणार?’ येथे तांगडे थोडी गल्लत करत आहेत. आजही आपल्या देशात सर्वात मोठा मालक म्हणजे सरकार. येथे “सरकार’ या शब्दांत केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था वगैरेंचा समावेश होतो. या नोकरीतील सेवाशर्तीत “सरकारवर टीका करणार नाही’ असं स्पष्ट नमूद केलेलं असतं. नोकरी स्वीकारताना लेखक/कलाकारालाही सेवाशर्त माहिती असते. ती मान्य केल्यावर मग लेखकाने शासनावर टीका करावी अशी अपेक्षा कशी ठेवता येईल? सरकारी नोकरीत असलेले अनेक लेखक निवृत्त झाल्यावर सरकारच्या विरोधात बोलतात, यामागे हे वास्तव आहे.
दुसरं म्हणजे भारतासारख्या गरीब देशांत अजूनही लेखक/कलावंत फक्त कलेच्या आधारे जगू शकत नाही (याला काही अपवाद आहेत) एकेकाळी याला “खासगी कंपनीतील नोकरी’ हा पर्याय समोर आला होता. पण आज असे दिसते की, खासगी कंपनीच्या नोकरीत राहून सरकारवर टीका करता येईलच, याची खात्री देता येत नाही. अनेक बड्या भांडवलदारांचे सरकारशी साटेलोटे असते. अशा खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी जर सरकारवर टीका केली तर ती खासगी कंपनी अशा कर्मचाऱ्यांना नारळ द्यायला मागेपुढे बघत नाही. दोन-चार वर्षांपूर्वी काही नामवंत पत्रकारांना एका टीव्ही चॅनेलने तडकाफडकी काढून टाकले होते. याचा अर्थ असा की, आपल्या देशात लेखक स्वतःच्या जगण्यासाठी अनेक पातळ्यांवर छुप्या पद्धतीने गुलाम असतो. असे असले तरी अशा स्थितीतही एकेकाळी अनेक लेखकांनी सरकारला धारेवर धरणारे लेखन केलेले आहे. यात लेखक कोणाची नोकरी करतो हा मुद्दा नसून लेखक स्वतःच्या मूल्यांशी कितपत प्रामाणिक आहे, हा आहे.
आजच्या वातावरणात संमेलनाध्यक्ष भारत सासणेंचे भाषण म्हणूनच महत्त्वाचे आहे. असे असले तरी त्यांनी “आविष्कार स्वातंत्र्याच्या संदर्भात लेखकाची सर्वकालीन जबाबदारी’चा उल्लेख करायला हवा होता, असे वाटते. जगभरचे आणि सर्व प्रकारचे सत्ताधारी नेहमी आविष्कार स्वातंत्र्याच्या विरोधात असतात, हे त्रिकालाबाधित सत्य त्यांच्या भाषणातून अधोरेखित व्हायला हवे होते.
प्रा. अविनाश कोल्हे