Mawal News: मृत्यूनंतरही सन्मानासाठी संघर्ष! मावळातील २३ गावांमध्ये स्मशानभूमी नाही; विकासाच्या दाव्यांची पोलखोल
Mawal News: कोटींच्या निधीच्या वल्गना, पण मृत व्यक्तीलाही मिळेना सन्मान; मावळ तालुक्यातील येवलेवाडी, कुंडमळा, राजमाचीसह २३ दुर्गम गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव.

– सोपान येवले
Mawal News – विकासाच्या गगनभेदी घोषणा आणि कोट्यवधी रुपयांच्या योजनांचा गाजावाजा होत असताना माणुसकी मात्र हरवल्याचे दिसत आहे. तालुक्यातील तब्बल २३ गावांमध्ये आजही कायमस्वरूपी स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिवंतपणी मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना मृत्यूनंतरही आपल्या माणसाला सन्मानाने अखेरचा निरोप देता येत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कुसवली गावातील गिरजाबाई चिमटे यांच्या निधनानंतर हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. आईच्या निधनाच्या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच अंत्यसंस्कार कुठे आणि कसे करायचे, असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. गावात कायमस्वरूपी स्मशानभूमी नसल्याने मुसळधार पाऊस, चिखल आणि प्रतिकूल परिस्थितीत ग्रामस्थांच्या मदतीने तात्पुरती व्यवस्था करून अंत्यसंस्कार करावे लागले.
मावळ हा डोंगरदऱ्यांनी वेढलेला आणि मोठ्या भौगोलिक विस्ताराचा तालुका आहे. अनेक दुर्गम गावांमध्ये आजही रस्ते, आरोग्य, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांसोबत स्मशानभूमीचाही प्रश्न गंभीर आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर दुःखाच्या प्रसंगी अंत्यसंस्कारासाठी जागा शोधण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. अनेक गावांमध्ये कायमस्वरूपी शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,
रस्ता किंवा प्रकाशव्यवस्था नसल्याने अंत्यसंस्कार करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक भीषण स्वरूप धारण करते. चिखलातून अंत्ययात्रा नेणे, ओढे-नाले ओलांडणे, रात्रीच्या वेळी मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार करणे, तात्पुरत्या पत्र्यांच्या किंवा बांबूंच्या आडोशात विधी पार पाडणे, अशी परिस्थिती अनेक गावांमध्ये आजही कायम आहे.
मृत व्यक्तीलाही सन्मानाने अखेरचा निरोप देता येत नसल्याची वेदना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे स्मशानभूमीसाठी कायमस्वरूपी जागा निश्चित करणे, संरक्षक शेड उभारणे, अंतर्गत रस्ता तयार करणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युत प्रकाश व्यवस्था, अंत्यविधीसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून कामांना प्राधान्य देण्याचीही मागणी होत आहे. कुसवलीतील चिमटे कुटुंबावर आलेली वेळ ही उद्या कोणत्याही गावावर येऊ शकते. त्यामुळे हा प्रश्न केवळ एका गावापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण तालुक्यातील स्मशानभूमीविना असलेल्या गावांचा सर्वेक्षण करून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे.
स्मशानभूमीची सक्षम व्यवस्था नसलेली गावे
येवलेवाडी, आर्डव, गेव्हंडे, जवन, शिरे, पानसोली, देशमुखवाडी, कुंडमळा, इंगकून, कुणेवाडी, अगसुटे, कांब्रे (ना.मा.), लोखंडवाडी, उंबरवाडी, कोंडिबडे (अ.मा.), धालेवाडी, प्रभाचीवाडी, मळवली, साई, नाणोली (ना.मा.), जांभवली, ठाकूरसाई गावठाण, उधेवाडी, राजमाची, पांगोळी आदी गावांमध्ये स्मशानभूमीची कायमस्वरूपी आणि सक्षम व्यवस्था नसल्याची तक्रार सातत्याने होत आहे. अनेक ठिकाणी जागेचा प्रश्न प्रलंबित आहे, तर काही ठिकाणी मंजुरी असूनही कामे वर्षानुवर्षे रखडली आहेत.






