Maval Rain: मावळात पावसाचा हाहाकार! लोणावळ्यात २४ तासांत २६७ मिमी पाऊस; प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
Maval Rain: नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे आणि बंद गटारांमुळे पूरपरिस्थिती; वेहेरगाव-एकविरा देवी मार्गावर भाविकांचा जीव धोक्यात.

Maval Rain – मावळ तालुक्यासह खालापूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. लोणावळा, कामशेत, कार्ला, कांब्रे-नाणे, खोपोली आदी भागांत रस्ते पाण्याखाली गेले, घरांमध्ये पाणी शिरले, तर अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. या सर्व घटनांमुळे पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाई, पाणी निचरा आणि रस्ते विकासकामांच्या गुणवत्तेवर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
लोणावळा शहरात अवघ्या २४ तासांत २६७ मिमी पावसाची नोंद झाली. नांगरगाव, भांगरवाडी, वाळवण, तुंगार्ली आणि भैरवनाथनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून अनेक घरांमध्ये पाणी शिरले. नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे आणि अरुंद झालेल्या पाणीवाहिन्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे उपनगराध्यक्ष देविदास कडू प्रचंड आक्रमक झाले.
त्यामुळे नांगरगाव येथे मुख्य नाल्यावरील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. कामशेतमध्ये इंद्रायणी कॉलनी, धावडे वस्ती, गावठाण आणि इतर सखल भाग जलमय झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने फर्निचर, धान्य, विद्युत उपकरणे व जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले. पाण्याचा योग्य निचरा न होणे, गटारांची अपुरी स्वच्छता आणि पीएमआरडीए तसेच आयआरबीकडून आवश्यक कामे वेळेत न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
कार्ला फाटा ते वेहेरगाव-आई एकविरादेवी मंदिर या महत्त्वाच्या मार्गावर पाणी ओसंडून वाहत असल्याने भाविक, पर्यटक, विद्यार्थी आणि स्थानिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. काही वाहने पाण्यात अडकली, तर काही बंद पडली. कोट्यवधी रुपये खर्चून रस्ता विकसित करण्यात आला असला तरी बंद गटारे आणि पाण्याच्या निचऱ्याचा अभाव यामुळे दरवर्षी हीच परिस्थिती उद्भवत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
कांब्रे-नाणे हद्दीतील रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यालगतच्या काही मोऱ्या बुजवल्याने पाण्याचा नैसर्गिक निचरा थांबून पाणी थेट रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. सर्वच ठिकाणी नागरिकांनी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने पाणी निचऱ्याची व्यवस्था,
अतिक्रमणांवर कारवाई, बंद मोऱ्या व गटारे मोकळी करणे, अपूर्ण कामे पूर्ण करणे आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्यांकडे प्रशासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी दीर्घकालीन नियोजनातून लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.






