Maval News: सरकारी साहित्याचीच झाली कचराकुंडी! प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गाव रोगराईच्या उंबरठ्यावर?
Maval News: पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आणलेले साहित्य वापराविना धुळखात; मान्सूनमध्ये साथीचे आजार पसरण्याची गावकऱ्यांमध्ये भीती.

Maval News – कामशेत-जांभवली मुख्य रस्त्यालगत नाणेगाव येथे अनेक वर्षांपासून पडून असलेल्या मोठ्या सिमेंटच्या मोऱ्यांचे कचराकुंडीत रूपांतर झाले आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. पावसाळा तोंडावर असताना या मोऱ्यांमुळे साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून ग्रामस्थांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. गावातील विविध ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी या सिमेंटच्या मोऱ्या आणण्यात आल्या होत्या.
मात्र, आजपर्यंत त्यांचा वापर करण्यात आलेला नसल्याने त्या रस्त्याच्या कडेलाच पडून आहेत. मोऱ्यांच्या आत आणि आजूबाजूला प्लास्टिक, घरगुती कचरा आणि इतर टाकाऊ साहित्य साचल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. गावाच्या प्रवेशद्वारालगतच हा कचरा साचल्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून गावाच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय कदम यांनी सांगितले की,
गेल्या अनेक वर्षांपासून या मोऱ्या वापराविना पडून आहेत. पावसाळ्यात त्यामध्ये पाणी साचल्यास डासांची उत्पत्ती होऊन रोगराई पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या मोऱ्या तातडीने उचलून आवश्यक त्या ठिकाणी बसवाव्यात आणि परिसरातील कचरा हटवून स्वच्छता मोहीम राबवावी. नाणे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन पावसाळ्यापूर्वीच मोऱ्या हटवून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.





