Shirur Water Crisis: घोडनदी पूर्णपणे कोरडीठाक! कोट्यवधींची गुंतवणूक धोक्यात; शिरूर-आंबेगाव परिसरातील शेतकरी हवालदिल
Shirur Water Crisis: मलठण, कवठे येमाई आणि फाकटे परिसरातील शेकडो कृषीपंप बंद; भाजीपाला, ऊस आणि चारा पिके वाचवण्यासाठी बळीराजाची धडपड.

Shirur Water Crisis – पावसाळा ऋतू सुरु झाल्यानंतरही वाढत्या उन्हाच्या झळा, पाऊस न पडल्याने निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई आणि बंधाऱ्यांमधील गळतीमुळे घोडनदीचे पात्र पूर्णपणे कोरडेठाक पडले आहे. परिणामी मलठण, आमदाबाद, आण्णापूर, कवठे येमाई, चांडोह, फाकटे परिसरातील गावांवर पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचे गंभीर संकट ओढवले आहे. घोडनदीवरील फत्तेश्वर बंधारा (कवठे येमाई), आमदाबाद येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा तसेच चांडोह व फाकटे येथील बंधारे महिनाभरापासून कोरडे पडले आहेत.
बंधाऱ्यांच्या ढाप्यांमधून झालेल्या गळतीमुळे साठवलेले पाणी वाया गेल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. त्यामुळे मलठण, कवठे येमाई, चांडोह, फाकटे, आमदाबाद, डोंगरगण, तामखरवाडी, निमगाव दुडे या गावांतील शेती पाण्याअभावी संकटात सापडली आहे. नदीपात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने शेकडो कृषीपंप बंद पडले आहेत. उपसा सिंचन योजना पूर्णपणे ठप्प झाल्याने फळबागा, भाजीपाला, ऊस आणि जनावरांच्या चारा पिकांना पाणी मिळणे अशक्य झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून उभारलेल्या फळबागा, भाजीपाला पिके आता करपू लागली आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधीच बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचा खर्च वाढल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच पाण्याअभावी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वेळेत पाणी उपलब्ध झाले नाही तर हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
फाकटे येथील शेतकरी नितीन पिंगळे म्हणाले, घोडनदीतील पाणीटंचाईचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नसून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. अनेक गावांमध्ये विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी झपाट्याने घटत असून भविष्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.
कोटींची गुंतवणूक धोक्यात
चांडोह येथील शेतकरी सुदर्शन भाकरे म्हणाले, नदीतील पाणी आटल्यामुळे कृषीपंप बंद पडले असून फळबागा, भाजीपाला आणि चारा पिकांना पाणी देता येत नाही. आधीच शेतीचा खर्च वाढला आहे. आता पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांची कोटींची गुंतवणूक वाया जाईल. मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल.
उपसा सिंचन योजना पूर्णपणे ठप्प
घोडनदी कोरडी पडल्याने आणि विजेच्या समस्येमुळे परिसरातील शेती पिके करपू लागली आहेत. बंधाऱ्यांमध्ये पाणी नसल्याने उपसा सिंचन योजना पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. पाणी उपलब्ध नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. डिंभे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी सोडले जात नाही.






